जिल्हा परिषद गट संख्या 82 वरून 73; तर गणांची संख्या 164 वरून 146 होणार?
पुणे – जिल्हा परिषद गट आणि गट यांची संख्या 2017 च्या निवडणुकीप्रमाणे कायम ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटांची वाढलेली संख्या पुन्हा घटणार असून, गट संख्या 82 वरून ही संख्या 73 तर पंचायत समिती गणांची संख्या 164 वरून 146 होणार आहे. परिणामी निवडणुकांचे सर्व आडाखे बदलणार असून आरक्षण सोडत देखील नव्याने काढली जाणार आहे. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या आरक्षण सोडतीत नाराज सदस्यांना पुन्हा आशेचा किरण मिळाला आहे. तर गट संख्या कमी झाल्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजी आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार जास्तीत जास्त 75 आणि कमीत कमी 50 गट जिल्हा परिषदेसाठी निश्चित करण्यात आले आहेत. पुणे जिल्हा परिषदेमध्ये 2017मध्ये झालेल्या निवडणुकीत 75 गट अस्तित्वात होते. यावेळी पुणे ग्रामीण जिल्ह्याची लोकसंख्या ही संपूर्ण राज्यामध्ये अव्वल होती. त्यामुळे सर्वाधिक 75 गट असण्याचा मान पुणे जिल्हा परिषदेला मिळाला होता; मात्र जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रातून हवेली आणि मुळशी तालुक्यातील 23 गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झाली.
वडगाव मावळ, देहू आणि बारामती तालुक्यातील माळेगाव येथे नगरपंचायती झाल्याने दोन लाख 23 हजार लोकसंख्या ग्रामीण क्षेत्रातून कमी झाल्याचा फटका बसला. त्यामुळे जिल्हा परिषदेचे तीन गट कमी होऊन एकूण गटांची संख्या 75 ऐवजी 73पर्यंत खाली आली. सद्यस्थितीत 33 लाख 88 हजार 513 लोकसंख्या गृहीत धरून आगामी निवडणुकीसाठी गट आणि गणरचना होईल या सूत्रानुसार पुणे जिल्हा परिषदेचे 73 गट असतील.
आरक्षणाच्या हरकतींचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला असून, तो राज्य निवडणूक आयोगाला सादर केला जाणार आहे. दरम्यान, आता राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार पुढील नियोजन केले जाईल. तसेच राज्य शासनाचे लेखी आदेश अद्याप प्राप्त होणे बाकी आहे.
-संजय तेली, नोडल अधिकारी निवडणूक
निर्णय फायद्यात की तोट्यात?
जिल्हा परिषदेच्या गट आणि गणाचे नुकतेच आरक्षण जाहीर झाले होते. त्यामध्ये अनेक दिग्गजांना धक्का बसला. आरक्षण मनासारखे न पडल्यामुळे निवडणूक लढवायची कोठून? असा प्रश्न उपस्थित झाला होता; मात्र राज्य शासनाने नव्याने घेतलेल्या निर्णयामुळे नाराज झालेल्यांना पुन्हा आशेचा किरण दिसू लागला आहे. मात्र, गट-गणांची संख्या कमी झाल्यामुळे सदस्यांना मिळणारी संधीही कमी झाली असून, भविष्यात आरक्षण पडल्यावर उमेदवारी मिळविण्यावरून वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संधी कोण साधणार, हे गट आणि आरक्षण सोडत झाल्यावरच स्पष्ट होईल.