शिवजन्मभूमी ही मावळ्यांना ऊर्जा देणारी
जुन्नर – आम्ही एक समाज बांधव गमावला आहे. सुनील कावळे यांच्या मृत्यूला हे सरकार जबाबदार असून त्याचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. सरकारने मराठा समाजाला फसविण्याचा प्रयत्न करू नये. आरक्षणाचा निर्णय लवकर जाहीर करावा, अन्यथा पुढील आंदोलन सरकारला झेपणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ते किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या महाराजांच्या स्मारकाजवळ आयोजित सभेत बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की आमच्या पाठीशी छत्रपती शिवाजी महाराजांचा, आई जिजाऊंचा आशीर्वाद आहे, आपण हा लढा जिंकणार आहोत, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शुक्रवारी (दि. 20) सकाळी जरांगे पाटील किल्ले शिवनेरीवर जाऊन नतमस्तक झाले. त्यांनी पायथ्याशी पादत्राणे काढून ठेवली आणि गडावर गेले. त्यांनी गडदेवता असलेल्या शिवाई देवीची आरती केली तसेच गडावरील विविध वास्तूंची, इतिहासाची माहिती घेतली. यावेळी मराठा समाजाच्या वतीने त्यांना गडावरील पवित्र मातीचा कलश देण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, शिवजन्माने पावन झालेली ही भूमी म्हणजे देशातील सर्वात पवित्र स्थान आहे. मावळ्यांना ऊर्जा देणाऱ्या या भूमीची माती मी कपाळी लावली आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान संघर्ष आणि ऊर्जेचे स्थान आहे. मराठा समाजाच्या अनेक पिढ्या हा लढा देत असून आता ही आरपारची लढाई आहे.
मराठा समाजातील प्रत्येक तरुणाने घरा-घरात जाऊन आरक्षण कशासाठी मागतोय सांगुन जनजागृती करावी. आरक्षणाची चळवळ उभी राहण्यासाठी मदत करावी. तुमचं हे लेकरू तुम्हाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही.
यावेळी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, माऊली खंडागळे, देवराम लांडे आदी नेते मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे आयोजन सकल मराठा समाज शिवजन्मभूमी यांनी केले होते. यावेळी ऍड. सचिन चव्हाण, सुनील ढोबळे, शिवम घोलप, संदेश बारवे, सौरभ गुंजाळ, विवेक पापडे, विवेक खंडागळे, प्रवेश देवकर, रुपेश जगताप, डॉ. विशाल आमले, संजय चिखले, सुजित मोरे, गणेश महाबरे, नरेंद्र तांबोळी, वैभव कोरडे, संतोष जाधव, प्रशांत देवणे, संजय खंडागळे, संतोष कबाडी, दिपक वाळुंज, नरेंद्र कासार, सुयश महाबरे, दिपक कोकणे, प्रवीण तळेकर व हजारो मराठा बांधव उपस्थित होते.
हारतुरे नको, माझा भाऊ गेला की
आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची जुन्नरला जय्यत तयारी करण्यात आली होती. स्मारकासमोर मोठ्या रांगोळ्या, मोठ्या संख्येने आलेली वाद्यपथके, पारंपरिक ढोल लेझीम पथके तसेच ओळीने जेसीबी उभे करण्यात आले होते. या जेसीबींमधून पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्याचे आयोजन करण्यात आले होते; मात्र माझा भाऊ गेला आहे, फुलांची उधळण, हारतुरे नकोच.. असा निरोप पाटलांनी गडावरून आयोजकांकडे धाडला. त्यामुळे पुष्पवृष्टी, हारतुरे, सत्कार आदी टाळण्यात आले.