जळोची -सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन विषमुक्त सेंद्रिय शेती उत्पादने घेऊन त्यामध्ये सातत्य ठेवले तर सेंद्रिय उत्पादक शेतकऱ्यांच्या आयुष्यात स्थिरता येईल, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री, पणनमंत्री व सहकार मंत्री यांच्या उपस्थितीत पुढील महिन्यांमध्ये मोर्फा सेंद्रिय शेती उत्पादक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
बारामती येथे पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले की, सेंद्रिय शेतीपुढे सध्या अनेक समस्या आहेत. पण संघटीतपणे सेंद्रिय शेती उत्पादनाचा एकच ब्रॅण्ड बनविल्यास शेतकरी ते ग्राहक साखळी मजबूत होऊन दोघांचाही फायदा होईल.
अनेक निर्यातदार व स्थानिक सुपर मार्केटचे प्रतिनिधी सर्व सेंद्रिय उत्पादने घेण्यास उत्सुक आहेत. पण गुणवत्तापूर्ण विषमुक्त मालाची हमी व सातत्याने पुरवठा ही त्यांची अट आहे. याबाबत शेतक-यांनी अभ्यासपूर्ण काम करून मार्केटची सेंद्रिय उत्पादनाची गरज पूर्ण करावी.
बैठकीस सेंद्रिय शेती उत्पादक शेतकरी प्रतिनिधी शिवरूपराजे खर्डेकर, प्रगतशील शेतकरी व मोर्फाचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे, सचिव प्रल्हाद वरे, तुषार कारले, सुनील ढवळे, अतुल कारले, समीर दुगणे, निलेश पांडे, राजेंद्र वरे, अमरजित जगताप, डॉ. गोवर्धन भुतेकर, डॉ. संदीप वाघ, डॉ. दीपक बहीर, गणेश पारेकर, विजय शितोळे, रोहित अहिवळे उपस्थित होते.