जाधववाडीतील शेतकर्यांना कृषी दुतांचे मार्गदर्शन
मंचर – शेतकर्यांनी शेती पिकं उत्पादन घेण्याअगोदर माती परीक्षण करूनच शेती उत्पादन घ्यावे. माती परीक्षण केल्यानंतर शेतामध्ये कोणत्या जीवाणूची कमतरता आहे, त्याची माहिती होते. यासाठी माती परीक्षण महत्त्वाचे आहे. असे मत कृषीदुतांनी जाधववाडी (ता. आंबेगाव) येथे शेतकर्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
जाधववाडी येथे कृषिदूत शेताच्या बांधावर जाऊन शेतकर्यांना शेतीविषयी माहिती देण्याचा उपक्रम राबवत आहेत. त्याचे गावकर्यांकडून स्वागत करण्यात आले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय, आंबी (ता. मावळ), येथील विद्यार्थी शेताच्या बांधावर जाऊन पीक पद्धती,
आधुनिक शेती, पीक प्रात्यक्षिके, माती परिक्षण, किड व रोग नियंत्रण आदी माहिती शेतकरी बांधवांना देत आहेत. कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हे विद्यार्थी तीन महिने जाधववाडी येथे मुक्कामी राहून आधुनिक शेतीबाबत मोफत प्रशिक्षण देणार आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे कार्यक्रम समन्वयक डॉ. अविनाश खरे व कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन कंकाळ यांनी दिली.
यावेळी कृषिदूत- निलेश येडे, मयूर आवटे, अभिषेक शेळके, सौरभ ओवाळ, अविनाश झिंजाडे आदी विद्यार्थ्यांचे स्वागत सरपंच अर्चना विशाल जाधव, उपसरपंच संपत रघुनाथ जाधव ग्रामसेवक अश्विनी बाळासाहेब लेंडे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व इतर ग्रामस्थांनी केले. यावेळी शेती उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषिदुतांकडून करण्यात आले.