मोदी 9 जनसंपर्क अभियानास सुरुवात : प्रदीप कंद, संदीप सातव यांचा पुढाकार
वाघोली – प्रदीप कंद यांच्या वाघोलीमधील एन्ट्रीने विधानसभेच्या तयारीला ते लागले, अशी चर्चा वाघोलीत सोशल मीडियावर जोरदार रंगू लागली आहे.
वाघोलीकरांच्या समस्या सोडवण्याचा भाजप नेते प्रदीप कंद यांनी छंद जोपासला असून वाघोलीमधील सोसायटीमधील नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रदीप कंद, संदीप भोंडवे यांनी घेतलेला पुढाकार सध्या नागरिकांचे लक्ष वेधत असून आगामी विधानसभेची तयारी सुरू झाल्याची चर्चा वाघोलीत मोठ्या प्रमाणात रंगू लागली आहे. वाघोलीमधील आव्हाळवाडी रोडवरील गणेशनगर भागातील साईराज पार्क, इंकाई सोसायटी, मदर मेरी सोसायटी, आदर्श पार्क, समर्थ पार्क व दुबेनगर भागातील नागरिकांशी भाजप नेते प्रदीप कंद यांनी संवाद साधून मोदी सरकारची विकास कामे आणि कल्याणकारी योजनेचे रिपोर्ट कार्ड देऊन नागरिकांना माहिती देण्यात आली.
यावेळी क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदीप भोंडवे, युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस माजी उपसरपंच संदीप सातव, बहुसंख्येने सोसायटीमधील नागरिक उपस्थित होते. या भागातील अंतर्गत रस्ते, स्ट्रीट लाईट, कचरा प्रश्न, ट्रान्सफार्मर, लो होल्टेज, इतर अनेक समस्या जाणून घेऊन त्या लवकरात लवकर सोडवल्या जातील तर इतर समस्यांबाबत याबाबतचा पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहेत असल्याचे कंद यांनी सांगितले.
साईराज पार्क 1 रस्ता करणे, साईराज पार्क 2 ते समर्थ पार्क रस्ता करणे, दुबेनगर लेन नंबर 13 रस्ता करणे, या ठिकाणचे रस्ते मंजूर झाले असून या रस्त्यांची पाहणी करून अंदाजपत्रक तयार करून पुढील कार्यवाही होणार आहे. राहू रस्ता ते तांबेवाडी सिमेंट कॉंक्रिट रस्ता करण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, यांच्याकडे निधी मंजूर करण्यासाठी प्रदीप कंद यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करत असून या रस्त्याची पुढील आठवड्यात पाहणी होणार आहे. या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे संदीप सातव यांनी सांगितले.
या भागातील अंतर्गत स्ट्रीट लाइट व अंतर्गत रस्ते 15 दिवसांत दुरुस्त करणार असून कचरा समस्या सोडविण्यासाठी या भागातील राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या घरातून कचरा गोळा करण्यात येणार आहे. या भागात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे लो होल्टेजची समस्या असून गणेशनगर भागामध्ये एक आणि दुबेनगरमध्ये एक ट्रान्सफार्मर बसविण्यात येणार आहे असल्याचे संदीप सातव यांनी सांगितले.