पवनानागर – पवना धरणग्रस्तांच्या रिक्त जागांसाठी 19 युवकांना नोकरी देत असताना धरणग्रस्त संघटना व स्थानिक गावपातळीवरील जबाबदार पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून या निवड केल्याबद्दल धरणग्रस्तांनी कमालीचा संताप व्यक्त केला आहे. विद्यमान आमदार सुनील शेळके व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी स्वत:च्या घरातील नातेवाईक व मर्जीतील युवकांना प्राधान्याने संधी दिल्याचा आरोप धरणग्रस्तांनी केला आहे. त्यामुळे पुढील होणाऱ्या परिणामाला दोन्ही आजी-माजी आमदारांनी तयार राहावे, असा इशारा दिला.
पवना धरणाचे बांधकाम 1965 बांधकाम सुरू झाले. त्यावेळी परिसरातील 22 पेक्षा जास्त गावे विस्थापित झाली. धरणामुळे विस्थापित झालेल्या 1203 खातेदारांचे पुनर्वसन करण्यात येईल व धरणग्रस्तांच्या प्रत्येकाला कायमस्वरुपी नोकरी देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु या गोष्टीला 50 वर्षांपेक्षा जास्त कालवधी लोटला परंतु ना पुनर्वसन झाले ना धरणग्रस्तांच्या वंचित खातेदाऱ्याला नोकरी मिळाली
नुकतेच मावळ तालुक्याचे विद्यमान आमदारस ुनील शेळके व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पवन मावळातील धरणग्रस्तांच्या 19 तरुणांना सुरक्षारक्षक म्हणून रूजू केले. या आशयाचे वृत्त सोशल मिडीयावर वाऱ्यासारखे पसरले. मात्र, आजी माजी आमदार समर्थकांनी आपल्या घरातील व जवळच्या नातेवाईक तरुणांची नावे दिली असल्याचे समोर आले. त्यामुळे सर्व धरणग्रस्तांमध्ये नाराजी पसरली आहे. या नोकर भरतीमध्ये गरजू तरुण डावलल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पवनानगर येथे धरणग्रस्त संयुक्त संघटनेची बैठक होती. येथे सर्व नाराज धरणग्रस्त शेतकऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना घेराव घालून मिळालेल्या नोकरीबाबात जाब विचारला.
पवना धरणग्रस्तांच्या रिक्त जागांसाठी 19 युवकांना नोकरी देत असताना धरणग्रस्त संघटना व स्थानिक गावपातळीवरील जबाबदार पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून या निवडीबद्दल पवन मावळातील तरुणांनी धरणग्रस्तांच्या पदाधिकाऱ्यांची पवनानगर येथे भेट घेऊन याबाबत विचारणा केली. अनेक वर्षेपासुन धरणग्रस्त पुनर्वसनापासुन वंचित आहेत तसेच पवनेच्या पाण्यावर मावळ तालुका. पिंपरी-चिंचवड एमआयडीसी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व व हद्दीतील हजारो कंपन्यांची तहान भागविली जात आहे. यामध्ये धरणग्रस्तांच्या वारसांना शिक्षणप्रमाणे नोकरी मिळावी, यासाठी संघटनेच्या वतीने पुढाकार घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे
यावेळी रविकांत रसाळ, नारायण बोडके, बाळासाहेब काळे, किसन घरदाळे, बबलु कालेकर, प्रल्हाद कालेकर, वसंत काळे, अनंता वर्वे, दत्ता कालेकर, पांडुरंग शेडगे, अनंता भालेराव आदीसह तरुण उपस्थित होते.
धरणग्रस्त शेतकऱ्यांचे आरोप
पवनमावळातील चावसर, वाघेश्वर, जवण नं 1, 2 व 3, ठाकुरसाई, आपटी, कोळे चाफेसर, शिंदगाव या गावातील सर्वाधिक क्षेत्र बाधित परंतु या गावातील तरुणांनी संधी नाही.
ज्या शेतकऱ्यांकडे आज एक गुंठा जमीन नाही त्यांना नोकरीची गरज असताना ज्यांचे पुर्नवसन झाले आहे, त्यातील बहुतांशी तरुणांना नोकरी
आजी माजी आमदारांनी धरणग्रस्त संघटनेशी चर्चा न करता कोणालाही विश्वासात न घेता परस्पर नावे पाठविली.
आमदारांच्या मागे पुढे करणाऱ्यांनाच नोकरी त्यामुळे इतर कार्यकर्ते नाराज
धरणग्रस्त तरुणांना नोकरीत घेत असताना आजी माजी आमदारांनी संघटनेला विश्वासात घेऊन बाधित 22 गावांतील तरुणांचा विचार होणे गरजेचे होते तसेच सर्व समाजातील घटकांना न्याय मिळणे आवश्यक होते
– लक्ष्मण भालेराव, मावळ तालुकाध्यक्ष, आरपीआय (आठवले गट)
पवना धरणाच्या पाण्यावर मावळ तालुका तसेच उद्योगनगरी पिंपरी चिंचवड पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात कंपन्या असुन याठिकाणी तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी पुढाकार घ्यावा ज्यांच्याकडे धरणग्रस्त दाखला झाला आहे अशा तरुणांना संधी मिळावी.
– रविकांत रसाळ
आमदारांनी आरोप फेटाळले
ज्या धरणग्रस्त शेतकऱ्यांकडे धरणग्रस्त दाखला होता त्यांनच्या वारसांना नोकरीत संधी दिली आहे. याबाबत कसलेही राजकारण नाही. पुढील काळातही काहींना संधी दिली जाईल.
सुनील शेळके, आमदार, मावळ