केतकावळे -पुरंदर तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने रुद्रावतार दाखवल्याने उरासुरलेला पण तोंडाशी आलेला खरिपाचा हंगाम निसर्गाने हिरावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे पूर्णत:मोडले आहे.
पुरंदर पायथ्याशी व घाटमाथ्यावर रविवारी (दि. 20) व सोमवारी (दि. 21) दुपारी दोनच्या सुमारास ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामध्ये पुरंदरच्या घाटात चिव्हेवाडी जवळील घाटरस्ता खचल्याने बऱ्याचवेळ रस्ता बंद होता.
जेसीबीच्या सहाय्याने दुरुस्ती केल्यानंतर वाहतूक पुर्ववत झाली. तर चिव्हेवाडी गावातील तिघांच्या घराच्या भिंती पडल्या असून त्यात केशव पन्हाळकर, वंदना देवकर, महेश बायको यांचा समावेश आहे. तर सर्वत्र मुसळधार पावूस झाल्याने भात खाचरे पूर्ण भरून वाहत आहेत. तर बरेच भात शेतीचे भात आडवे पडली आहेत. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते.
तर रविवारच्या पावसाने सासवड-हडपसर या महामार्गावरील पवारवाडी येथील जुना पूल पाण्याखाली गेल्याने कित्येक तास एकरी वाहतूक सुरू होती. तसेच कुंभारवळण रस्त्यावरील पुलावरूनही पाणी मोठ्या प्रमाणात वाहत होते. तसेच सर्वत्र रात्राभर विद्युत पुरवठा बंद झाला होता. त्यामुळे नागरिकांची मोठीच गैरसोय झाली. सासवडमध्ये मध्यरात्री तर ग्रामीण भागात सकाळी 11 नंतर विद्युतपुरवठा सुरळीत झाला.
गेल्या 24 तासांतील मंडल निहाय पाऊस (मिमीमध्ये)
सासवड : 30, जेजुरी : 12, राजेवाडी : 45, परिंचे : 32, कुंभारवळण : 52, भिवडी : 31 वाल्हे : 40
पंचनामे पूर्ण होत नाही तोच…
वाटाणा, भुईमूग, बाजरी, मूग, घेवडा, कांदा, सीताफळ, अंजिर आदी पिके नष्ट झाली आहेत. तर कोथांबीर, मेथी, पालक, शेपू, कांद्याची रोपे पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटी सदृशय पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसताना पुन्हा एकदा वरुणराजाने आपला रुद्रावतार दाखविला आहे. पाण्यातून कशीबशी काढलेली बाजरी व कणसे कापून ठेवली खरी; परंतु घरात नेण्यापूर्वीच पावसात ती भिजल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे.