विविध समस्यांवरून नागरिक आक्रमक : पंचायत समितीपुढील अनधिकृत ओटा तोडला
राजगुरुनगर – राजगुरूनगर शहरास असंख्य समस्यांनी ग्रासले असून निवेदने, आंदोलने करून प्रश्न सुटत नसल्याने अखेर नागरिकांच्या संयमांचा बांध रविवारी (दि. 25) फुटला. खेड पंचायत समितीपुढील अनधिकृत केलेला ओटा तोडला व शहरातील वाडा रस्त्यावर केलेल्या अतिक्रमण आणि पार्किंगवाल्यांना समज दिली. तर मंगळवारी (दि. 27) रस्त्यातील अतिक्रमणे हटविण्यात येणार असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
राजगुरुनगर शहरात वाहतूक कोंडीमुळे दोन दिवसांपूर्वी एका सहा महिन्यांच्या मुलीचा अपघातात मृत्यू झाला, त्यानंतर शहरातील सजग नागरिक जागा झाला असून वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील पार्किंग हटवण्यासाठी “आम्ही राजगुरूनगरकर’ या बॅनरखाली पक्ष संघटना विसरून शहरातील नागरिक एकत्र आले आहेत. रविवारी (दि.25) या संदर्भात खेड पंचायत समितीच्या मैदानात शहरातील नागरिकांची बैठक झाली. या बैठकीत अपघातात मृत झालेल्या 6 महिन्यांच्या पिलू कैलास आढळ हिला श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी भीमशक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय डोळस, मारुती सातकर, अविनाश कहाणे, बाळासाहेब कहाणे, मिलिंद शिंदे, सागर सातकर, संतोष भांगे, भाऊसाहेब फुके, मनोहर सांडभोर, अमर टाटिया, मंगेश गुंडाळ, मच्छिंद्र पवळे, ऍड. मनीषा टाकळकर, निलोफर मोमीन, नितीन सैद, अनिल जाधव, ऍड. संदीप भोसले, वैभव घुमटकर, राहुल आढारी, सुभाष होले, दीपक थिगळे, जयंत घोरपडे, दिलीप होले, भाऊ भालेकर, मनोज सावताडकर, बापू नगरकर, सुनील वाळुंज, कैलास दुधाळे, माणिक होरे, राजेंद्र सांडभोर, राहुल पिंगळे, सुनील थिगळे, सुदाम कराळे, ऍड. निलेश आंधळे, लोंढे यांच्यासह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते.
विजय डोळस म्हणाले की, सर्वसामान्य पथारीधारक व नागरिकांची अतिक्रमणे पोटासाठी केली, पण शासकीय कार्यालये, शाळा यांच्यापुढे असलेल्या मोठ्या मैदानाच्या गेटला टाळे लावले आहेत. ही काय त्यांच्या घरची मालमत्ता आहे का? त्या जागेत वाहनासाठी पार्किंग केली तर रस्त्यावर होणाऱ्या पार्किंगला मर्यादा येईल. दरम्यान, आता गांधीगिरी करून चालणार नाही. आता क्रांती करण्याची गरज भासली आहे. अतिक्रमणे हटविण्यासाठी, रस्त्यात होत असलेल्या पार्किंगबाबत येथील अधिकारी टोलवाटोलवी व बनवाबनवी करत आहेत. अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांना जाब विचारू, त्या निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या झाल्या पाहिजेत, असे नमूद केले.
राजकारण्यांनी केले वाटोळे
राजकारण्यांनी राजगुरूनगरच्या विकासाचे वाटोळे केले आहे. त्यांनीच अतिक्रमणे केली आहेत. नगर परिषदेच्या काही पुढाऱ्यांनी, नगर सेवकांनी ठेकेदारी सुरू केल्याने शहरातील समस्यांमध्ये वाढ झाली आहे.रस्ते खिळखिळे झाले आहेत. पाणी वीज आरोग्य आणि कचरा प्रश्न गंभीर झाला आहे. रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी पुढाऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन दीपक थिगळे यांनी केले आहे.
वाडा रस्ता मोकळा करणार
महात्मा गांधी शाळेपुढे वाडा रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढून टाकण्यात येणार आहे. त्या मागे असलेल्या पदपथावर पथारीधारकांना जागा देऊन वाडा रस्ता मोकळा केला जाणार आहे. हुतात्मा राजगुरु यांची चित्रसृष्ट्टी करण्याच्या नावाखाली उभारलेले अतिक्रमण हटविण्याचा सावनुमते निर्णय घेण्यात आला आहे.