(डॉ. राजू गुरव) बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी कॉंगेसचा बालेकिल्ला आहे. आता हा बालेकिल्ला बळकाविण्यासाठी भाजपने लक्ष केंद्रीत करुन त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या मतदारसंघाचा नुकताच दौरा केला. आधी पक्ष संघटन मजबूत करायचे अन् त्यानंतर निवडणुकीचा सामना करायचा, अशी भाजपची रणनीती असणार आहे. बारामती मतदारसंघ सहजासहजी जिंकणे भाजपला शक्य होणार नाही हे उघडच आहे. मात्र बारामती मतदारसंघाच्या वर्चस्वासाठी राष्ट्रवादी व भाजप यांच्यात युद्ध मात्र सुरू झाले आहे. विकासकामांवरुन भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आरोप-प्रत्योरापही रंगू लागले आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघात खडकवासला, भोर, पुरंदर, दौंड, इंदापूर, बारामती या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश केला जातो. दौंडमध्ये राहूल कुल व खडकवासल्यात भीमराव तापकीर हे भाजपचे आमदार आहेत. पुरंदरमध्ये संजय जगताप तर भोरमध्ये संग्राम थोपटे हे कॉंग्रेसचे आमदार आहेत. बारामतीत अजित पवार, तर इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत. यावरुन भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेस या पक्षांचे प्रत्येकी दोन विधानसभा मतदारसंघात वर्चस्व असल्याचे स्पष्ट होते.
बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांनी पाच वेळा, अजित पवार यांनी एकदा अन त्यानंतर सुप्रिया सुळे तीन वेळा खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले. सन 2009 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कांता नलावडे यांच्याविरुद्ध 3 लाख 36 हजार 831, सन 2014 मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्याविरुद्ध 69 हजार 719, सन 2019 मध्ये भाजपच्या कांचन कुल यांच्याविरुद्ध
1 लाख 55 हजार 774 या मताधिक्क्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या.
बारामती मतदातसंघात काही विकास प्रकल्प राबविण्यात आले असले, तरी 100 टक्के विकास झाला नाही, हे सत्यही नाकारता येणार नाही. बारामतीच्या विकासाचे मॉडेल पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली होती. “शरद पवारांचे बोट धरुन राजकारणात आलो,’ असे म्हणणाऱ्या मोदी यांनीच आता बारामतीचा गड जिंकण्यासाठी भाजपच्या नेत्यांना कामाला लावले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व आमदार प्रा. राम शिंदे यांच्याकडे या मतदारसंघाचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. सीतारामन यांनी तीन दिवसांचा दौरा करत तब्बल 21 कार्यक्रम घेत मतदारसंघ पिंजून काढला. यात प्रामुख्याने भाजपचे कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांची मते जाणून घेण्यात आली. केंद्र शासनाच्या योजनांचा आढावाही घेतला. बारामतीत कोणत्या एका परिवाराला लक्ष्य करण्यासाठी नव्ह,े तर भाजपचे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आल्याचे सीतारामन यांनी बोलून दाखविले. त्यांच्या दौऱ्याची काही ना काही फलनिष्पत्तीही होणारच आहे.
सीतारामन यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार, सुप्रिया सुळे यांनीही मतदारसंघात बैठका, कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. सन 2019 च्या निवडणुकीच्या वेळी हर्षवर्धन पाटील हे कॉंग्रेसमध्ये होते. मात्र त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना कॉंग्रेसच्या संभ्राम थोपटे यांचे मंत्री होण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. याचे आगामी सन 2024 मधील लोकसभा निवडणुकीत निश्चित काही ना काही परिणाम होणार आहेत.
केंद्रातील व राज्यातील सत्तेच्या शक्तीचा वापर भाजप बारामती जिंकण्यासाठी नक्कीच करतील. भाजपने मोर्चेबांधणी जोरात सुरू केली असून, त्यांचा झंजावत सुरुच ठेवण्याचा चंग बांधलेला आहे. भाजप कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालणार याबाबतही राजकीत वर्तुळात उत्सुकता निर्माण झालेली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही गाफील न राहता मतदारांच्या अडीअडचणी जाणून घेऊन प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार आहेत. मतदारराजा कोणाच्या पारड्यात मते टाकणार, हे येणारा काळच ठरविणार आहे.