राजगुरूनगर – खेड तहसीलदार कार्यालयापुढे सुरु असलेले पुनर्वसनाबाबतचे पदरवाडी ग्रामस्थांचे उपोषण आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी हिवाळी अधिवेशनातून उपस्थितीत केलेल्या प्रश्नानंतर आज (दि. 13) तीन दिवसानंतर मागे घेण्यात आले. भोरगिरी ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट असलेल्या पदरवाडी ग्रामस्थ भूसख्खलन होण्याच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी पुर्नवसन करण्याची मागणी शासनाकडे अनेक वर्षांपासून करीत आहेत.
यावर्षी पदरवाडीच्या मागे सहा फूट खोल आणि पाचशेमीटर लांबीची भेग पडल्याने ग्रामस्थांच्या भीतीमध्ये मोठी वाढ झाली. यंदाच्या पावसाळ्यात अशी परिस्थिती झाली असल्याने पुढे मोठा धोका आहे. त्यावर पुनर्वसन हा एकमेव पर्याय आहे आणि शासन याकडे लक्ष देत नाही म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुणे जिल्हा बिरसा ब्रिगेडच्या मार्गदर्शनाखाली पदरवाडी मधील सामा काठे, कुंडलिक हांडे, कैलास काठे यांच्यासह सोनाली डामसे, यमुनाबाई हिले या पाच ग्रामस्थानी तीन दिवसांपूर्वी खेड तहसिलदार कार्यालयापुढे आमरण उपोषण सुरु केले होते.
खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर सरकारी पातळीवर तात्काळ हालचाली सुरु झाल्या. अधिवेशन झाल्यानंतर लगेचच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, वनमंत्री व संबंधित खात्याचे मंत्री पुणे जिल्हाधिकारी आमदार बिरसा ब्रिगेड आणि स्थानिक नागरिक प्रतिनिधी यांच्यात बैठक घेऊन हा प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे आश्वासन शासनाकडून आमदार दिलीप मोहिते पाटील यांना मिळाले असल्याने त्यांनी हा संदेश उपोषणकर्त्यापर्यंत पोहचवला व उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती.
दूध संघाचे संचालक अरुण चांभारे व तालुका राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास सांडभोर आणि ग्रामस्थ यांच्यात दूरध्वनीवरून संपर्क झाल्यानंतर पदरवाडी ग्रामस्थांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. उपोषण सोडते वेळी तहसीलदार प्रशांत बेडसे, नायब तहसिलदार मदन जोगदंड, जि. प. माजी सदस्या सुरेखा मोहिते, मंगल चांभारे, जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, बाजार समितीचे उपसभापती विठ्ठल वनघरे, सुरेश शिंदे, भोरगिरीचे सरपंच दत्ता हिले, बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पारधी, खेड तालुका अध्यक्ष एकनाथ तळपे, संतोष भांगे, रामदास ठोकळ, नितीन गुरव, मनीषा टाकळकर, सुरेश शिंदे, सुजाता पचपिंड यांच्यासह उपोषणकर्ते व पदरवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
या आंदोलनाला जेष्ठ नेते देवदत्त निकम, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, बाबाजी काळे, खेड पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे, सुरेश शिंदे, हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा ऍड मनीषा टाकळकर, आशा तांबे, मनीषा सांडभोर, राहुल आढारी, शंकर राक्षे आदींनी भेट देत पाठिंबा दिला. खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने याबाबत सरकारने निर्णय घेतला नाहीत तर तीव्र लढा उभारला जाईल असा इशारा दिला आहे.
“समाजाला न्याय मिळेल यासाठी अधिकारी वर्ग असतो; मात्र त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असतात. पदाची राखण करीत समाज सांभाळावा लागतो. पदरवाडी ग्रामस्थांनी उपोषणातून प्रशासन, शासनाला आर्त हाक दिली आहे. त्याची दखल घेतली जाईल.” -सुरेखा मोहिते पाटील, माजी जि. प. सदस्या
“पदरवाडी गावाला भेट देऊन पाहणी केली आहे. तसा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला होता. स्थापत्य व्यवस्थापन अधिकार्यांच्या आम्ही संपर्कात आहे. त्यांनी आम्ही दिलेल्या प्रस्ताव मान्य केला आहे. पर्यायी जागा खेड, आंबेगाव तालुक्यात आहे. तेथे पुनर्वसन करण्यासाठी प्रस्ताव केला आहे.” -प्रशांत बेडसे, खेडचे तहसीलदार