विल्हेवाट लावण्यात प्रशासन अपयशी : कारभारावर नागरिकांची नाराजी
ओतूर – ओतूर (ता. जुन्नर) गावात जिकडे तिकडे कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून तो पेटवण्यात येत असल्याने प्रदूषणात अधिकच भर पडत आहे. दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाही यावर मूग गिळून गप्प असून तोडगा काढण्यात ही अपयशी ठरत असल्याने ग्रामपंचायत प्रशासन नक्की करते तरी काय, असा सवाल नागरिकांनी उपस्थितीत केला आहे.
ओतूर शहरातील कचरा श्री कपर्दिकेश्वर मंदिर रस्त्यावरील अवचट सांस्कृतिक भवनजवळ टाकला जात आहे. घंटागाडीने एकत्रित केलेला हा गावातील कचरा गेले दोन तीन आठवड्यांपासून पेटवल्यामुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसले आहे. या जाळलेल्या कचऱ्यात प्लॅस्टिकचे प्रमाण अधिक असल्याने त्यातून विषारी वायू उत्पन्न होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
श्री कपर्दिकेश्वर मंदिराच्या पलीकडे पिंपळगाव जोगा धरण कालवा असून त्यालगत सगळ्या गावाचा ओला आणि सुका कचरा तसेच यामध्ये काही प्रमाणात वैद्यकीय कचरा देखील फेकला जात असल्याने येथेही मोठ्या प्रमाणावर कचरा साचतो. हा कचरा पेटविला जात असून त्याची विल्हेवाट लावण्यास देखील प्रशासन निष्क्रिय ठरत असल्याचे समोर असल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.
व्यवस्थापन केवळ कागदावर?
ओतूर गावात कचरा व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने सुरुवात करून एक पाऊल टाकले आहे; मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याने कचरा व्यवस्थापन कागदावरच ठेवण्यात प्रशासन धन्यता मानतात का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.