ग्रामस्थ आक्रमक : प्राणांतिक उपोषणाचा निवेदनाद्वारे इशारा
भूसख्खलनाची भीती असतानाही सरकारकडून केवळ बघ्याची भूमिका
राजगुरूनगर – खेड तालुक्यातील पदरवाडीमध्ये भूसख्खलन होण्याची भीती वाढली असताना प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून ठोस भूमिका घेतली जात नाही.
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी, 16 कुटुंबाचे कायमस्वरूपी पुनर्वसन होण्यासाठी सोमवारी (दि. 11) खेड तहसीलदार कार्यालयापुढे बिरसा ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली पदरवाडीचे ग्रामस्थ बेमुदत प्राणांतिक उपोषण करणार आहेत. या मागणीचे निवेदन खेड तहसीलदार, खेडचे प्रांत जिल्हाधिकारी, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना मंगळवारी (दि. 5) देण्यात आले. खेड तालुक्यातील भीमाशंकरवाडीच्या मागे पदरवाडी ही जेमतेम 16 ते 20 घरांची वस्ती वाडी आहे.
या वाडीच्या मागील भाग सपाट असून त्याखाली मोठा कडा आहे. वाडीच्या मागे असलेला भाग यावर्षीच्या पावसात सुमारे सहा ते फूट खोल आणि सुमारे 500 मीटर लांबीच्या भेगापडून भूसख्खलन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावर्षी प्रशासनाकडून येथे जमिनीला पडलेल्या मोठ्या भेगेची पाहणी करण्यात आली; मात्र तयार कोणतीच ठोस भूमिका निर्णय प्रशासनाने घेतला नाही.
तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्यासह, अप्पर तहसीलदार डॉ. नेहा शिंदे, निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड, मंडलाधिकारी शारदा बढे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर राऊत, तलाठी शिवाजी तेलंगे, दीपक पायगुडे या अधिकार्यांनी पदरवाडीत भेट देत भूसख्खलन होणार्या भागाची पाहणी केली होती.
पावसाळ्यात खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी पदरवाडीमधील सर्वांचे कायमस्वरूपी पुर्नवसनासाठी सरकारी गायरान जागा उपलब्ध करण्याबाबत तातडीने जिल्हाधिकार्यांना प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे अश्वासनाचे दिले मात्र ग्रामस्थांना याबाबत कोणतीही सूचना माहिती आतापर्यंत मिळाली नाही त्यामुळे प्रशासन आपल्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
नोटिसापलिके काहीच नाही
काही वर्षांपासून दरवर्षी पावसाळा आला कि येथील 16 कुटुंबाना महसूल प्रशासनाकडून नोटीस पाठवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. त्यापलीकडे प्रशासनाची भूमिका नाही. प्रशासनाला दरवर्षी ग्रामस्थ पुनर्वसन करण्याची मागणी करतात मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत हा विषय पुढे ढकलण्यात येतो यावर्षी मात्र वाडीच्या मागे पावसाळ्यात 300 मीटर लांब व चार फूट खालीपर्यंत जमीन खचल्याने ग्रामस्थांची भीती वाढली. प्रशासनही काहीसे खडबडून जागे झाले.