ऍड. असीम सरोदे ः इंदापूर येथील झाड व पक्ष्यांचा बळी गेलेल्या ठिकाणची पाहणी
इंदापूर – इंदापूर शहरातील वीरश्री मालोजीराजे गढीवरील पुरातन वृक्ष म्हणजेच हेरिटेज ट्री बेकायदेशीरपणे पाडल्याने, त्यामध्ये शेकडो चित्रबलाक व वटवाघुळ तसेच फ्लेमिंगो पक्ष्यांचा नाहक बळी गेला. घटनास्थळाची वकिलांनी पाहणी केली. आता कायदेशीर लढाई लढताना, न्यायिक मार्गाने लढा देणार आहोत. पक्षांचे बळी गेले तसे अधिकाऱ्यांच्या नोकऱ्यांचे बळी जातील, असे प्रतिपादन प्रसिद्ध मानवीहक्क विश्लेषक ऍड. असीम सरोदे यांनी केले.
इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने प्रा. कृष्णा ताटे, राष्ट्रसेवा दलाचे राज्य समन्वय गफूर सय्यद व रमेश शिंदे यांनी याबाबत न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय घेतला असून, न्यायालयात जाण्याअगोदर घटनास्थळ व इंदापूर कचरा डेपो या ठिकाणी, प्रसिद्ध विधितज्ञ ऍड. असीम सरोदे यांना व त्यांची वकिलांची फौज घेवून सदर घटनेची माहिती दिली. यामध्ये ऍड. रमेश तारू, ऍड. आशुतोष भोसले, ऍड. बाळकृष्ण निढाळकर, ऍड. श्रिया आवले, ऍड. धनश्री ढोहे, ऍड. राहुल मेढे, ऍड. तेजस हुसळे यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली.
ऍड. सरोदे म्हणाले, मला देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे, ज्या पद्धतीने हे झाड तोडण्यात आले आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण अपारदर्शकता आहे. झाड पाडण्यामागे अजून कोणत्या प्रेरणा आहेत का? कोणते आर्थिक हितसंबंध आहेत का? हे तपासावे लागणार आहे. कोर्टामध्ये आम्ही बाजू मांडणारच आहोत, पण न्यायालयीन प्रक्रिया ही नेहमीच वेळखाऊ आणि किचकट असते. त्याच्यामध्ये लढाई वेगळ्या लेवलवर नेऊन ठेवावी लागते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण अभिवादन केले. विनाकारण जो एखादे झाडंच काय, त्याची फांदीसुद्धा तोडली तर, त्याचे हात कलम केले पाहिजे. इतक्या नेमक्या शब्दांत छत्रपती शिवाजी महाराजांनी पर्यावरणाचा घोषणापत्र तयार केलं होते. त्याच पार्श्वभूमीवर इथे वीरश्री मालोजीराजे भोसले यांची जी गढी आहे, तेथील झाडाची अशी बेकायदेशीरपणे कत्तल नव्हे, खून करण्यात येतो. हे अत्यंत क्लेशदायक आहे. इंदापूर न्यायालयात हे प्रकरण दाखल करण्यात आले असून, कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पुढील सुनावणी दि. 15 जुलै 2023 रोजी ठेवण्यात आली असून, त्यामध्ये संबंधित विभागांच्या वरिष्ठांकडून कारवाई करण्याचे आदेश घेण्यात येणार आहे.
मुख्य आरोपी म्हणून कापरे यांचा उल्लेख
इंदापूर न्यायालयात न्यायालयीन प्रक्रियेसाठी ऍड. असीम सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली याचिका दाखल करण्यात आली असून, यामध्ये इंदापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांना मुख्य आरोपी करण्यात आले आहे. तसेच वनविभाग व संबंधित अनेक विभागांच्या अधिकारी यांना आरोपी करण्यात आले आहे. यामध्ये न्यायालयीन लढा लढत असताना नागरी संघर्ष समितीला यश नक्कीच मिळेल, असे आश्वासन देखील दिले आहे.