बारामती – माळेगाव ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुकांच्या स्वप्नावर पाणी फेरले असून इच्छुकांना जबरदस्त हादरा बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णायक निर्णय घेतल्याने माळेगाव परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे.
करोनामुळे राज्यातील एप्रिल ते डिसेंबर 2020 अशी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. दि.15 जानेवारीला मतदान होणार होते. मात्र, अनपेक्षितपणे निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रुपांतर करण्याचे पत्र आल्याने गावातील राजकारणाची दिशा बदलून गेली आहे. एकीकडे निवडणुकीची तयारी करताना जोर, बैठका मारणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे अवसानच गळाले आहे.
दरम्यान, अनेकांनी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी वर्षभरापासून जय्यत तयारी केली होती. करोनाकाळात अनेकांना विविध प्रकारे मदत केली होती. वैद्यकीय मदत, लग्नकार्य, निधन, इतर कार्यक्रमात आवर्जून उपस्थित होते. मतदारांना जेवण, मद्य देण्यात आले होते. विविध आश्वासनांची खैरात करून मतदारांना आकर्षित केले होते. काही जणांनी लाखोंच्या घरात खर्च केले होते.
पाण्यासारखा पैसा खर्च करून हाती काही लागले नाही. त्यामुळे भावी उमेदवार हिरमुसले आहेत. अनेकांनी पदरमोड करून वॉर्डात रस्ते, हायमास्ट दिवे व इतर कामासाठी खर्च केले होते. आता मात्र शाश्वती देता येणार नाही. त्यामुळे भविष्यातील गणिते आखून रणनिती आखलेल्या उमेदवारांना आता धास्ती लागून राहिली आहे.
पवार- तावरे गटात रस्सीखेच होणार?
माळेगाव हे राज्यातील चर्चेचे केंद्र असते. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गावावर एकहाती वर्चस्व राखण्यासाठी नगरपंचायत निर्मिती झाली असल्याची चर्चा गावात सुरू होती. मात्र, नगरपंचायत ताब्यात घेण्यासाठी अजित पवार समर्थक व कट्टर विरोधक भाजपा नेते रंजन तावरे यांच्यात राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू होणार आहे.