पुरंदर-हवेलीतील प्रवाशांची आर्त हाक : एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना थांबा कधी मिळणार?
समीर भुजबळ
वाल्हे – राज्य परिवहन महामंडळाच्या तुलनेत रेल्वेचे तिकीट दर ग्रामीण भागातील जनतेला परवड नाहीत. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास तसेच शेतमाल विक्रीसाठी पुण्याला घेऊन जाण्यासाठी पॅसेंजर हे ग्रामीण शेतकऱ्यांचे स्वस्तात साधन होते; मात्र सातारा जिल्ह्यातील व पुरंदर-हवेली तालुक्यातील लहान-लहान स्थानकात सध्या केवळ एकच गाडी थांबते. त्यामुळे इतर रेल्वे गाड्यांना पुरंदर-हवेलीतील रेल्वे स्थानकांत कधी थांबा मिळणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
पुरंदर-हवेलीतील ग्रामीण भागातील बहुतांश तरुण पुणे-मुंबई येथे उच्च शिक्षण घेतात. तेथे राहणे, खाणे परवडत नसल्याने, ते सकाळी जाऊन रात्री पुन्हा गावी येत असत. यासाठी पॅसेंजर हे उत्तम माध्यम होते. यासाठी सातारा-पुणे डेमू कोल्हापूर-पुणे पॅसेंजरचा फायदा होत होता. या गाड्या सर्वच स्थानकात थांबत होत्या. सध्या केवळ सातारा-पुणे, सातारा-कोल्हापूर ही एकच गाडी सर्व स्थानकात थांबत आहे.
करोना संकटामध्ये बंद ठेवण्यात आलेली, मुंबई-कोल्हापूर (कोयना एक्सप्रेस) सुरू करण्यात आली. पण पहाटे जाणारी सह्याद्री एक्सप्रेस वेगवेगळी कारणे करुन आजही बंदच ठेवण्यात आली आहे. वास्तविक सह्याद्री एक्सप्रेस ही य मार्गावरील सर्वांत जास्त प्रवासी संख्य असलेली प्रवासी गाडी होती. सातारा जिल्ह्यातील वाठार, लोणंद तसेच पुरंदर तालुक्यातील नीरा, जेजुरी येथील व्यापारी, शासकीय कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मुंबईतील एका दिवसाच्या कार्यासाठी ही गाडी सोयीस्कर होती. त्यामुळे सह्याद्री एक्सप्रेस ही लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी, व्यावसायिकांनी रेल्वे बोर्डाच्या पुणे डिव्हिजनल कार्यालयाकडे मेलद्वारे केली आहे.
पुरंदर-हवेलीतील 10 स्थानकांतून रेल्वे सेवा
पुरंदर-हवेलीत 10 स्थानके असून दोन स्थानके सोडून आठ स्थानके लहान आहेत. तेथे एक्स्प्रेस थांबत नसल्याने पॅसेंजरचा आधार आहे. यामध्ये सातरा जिल्ह्यातून प्रवेश केल्यानंतर पुरंदर मधील नीरा हे पहिले स्टेशन आहे. त्यानंतर वाल्हे, दौंडज, जेजुरी, राजेवाडी, आंबळे तर हवेलीमधील शिंदवणे, आळंदी (म्हतोबा), फुरसुंगी, सासवड व घोरपडी रस्ता यांचा समावेश आहे.
नीरा व जेजुरी या दोन मोठ्या स्थानकात एक्स्प्रेस थांबतात पण, ग्रामीण भागात व्यवसाय करणाऱ्यांना त्यासाठी मोठ्या शहरापर्यंत जावे लागते. तेथून एक्स्प्रेसने प्रवास करावा लागतो. ही गाडी लहान-लहान स्थानकांमध्येही थांबली व्यवसाय सांभाळत माल खरेदीसाठी जाता येईल. दौंडज रेल्वे स्थानकांत फक्त पॅसेंजर गाडीला थांबा आहे. सर्वच गाड्या ग्रामीण भागातील स्थानकात थांबल्या तर जनतेचे जनजीवन सुरळीत चालेल.
– सीमा भुजबळ, सरपंच, दौंडज, ग्रामपंचायत
ग्रामीण भागातून अनेक शेतकरी दूध, भाजीपाला घेऊन पुण्याला जात असतात. छोट्या शेतकऱ्यांना खासगी वाहन भाड्याने करणे परवडत नाही. तसेच घर ते पुणे येऊन जाऊन शिक्षण घेणे परवडते अशावेळी पॅसेंजर रेल्वेच फायदेशीर ठरत असते; मात्र पॅसेंजर रेल्वेगाडी एकच असल्याने, अनेकदा विद्यार्थी, व्यवसायिकांना गाडी मिळत नाही.
– राजेंद्र तांदळे, नोकरदार, वाल्हे
पुरंदरच्या ग्रामीण भागातील वाल्ह्यातून पुणे शहरात नोकरी व्यावसाया निमित्ताने जाणाऱ्यांना, बसने प्रवास करणे आता परवड नाही. रेल्वेचे 25 रुपये तर एसटीचे 100 रुपये टिकीट आहे. डीझेलचे दर वाढल्याने एसटीला जवळजवळ चौपट दर वाढले आहेत; मात्र त्या तुलनेत रेल्वे तिकिटाच्या दरात तितकीशी वाढ झाली नाही. त्यामुळे सध्याच्या महागाईत बसऐवजी रेल्वे बरी म्हणावी लागत आहे.
– उमेश गायकवाड, वाल्हे नोकरदार
पुरंदरच्या ग्रामीण भागातून पुणे-मिरज लोहमार्ग गेला आहे; मात्र या लोहमार्गाचा ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असा फायदा झाला नाही. या लोहमार्गावरून जाणाऱ्या सर्वच लांब पल्ल्यांच्या गाड्यांना थांबा दिल्यास आजूबाजूच्या गावांचा विकास होण्यास नक्कीच मदत होईल.
– अमोल खवले, सरपंच, वाल्हे