कात्रज –कात्रज-कोंढवा रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे रस्ता अरुंद होऊन राजस चौक ते शत्रुंजय मंदिर चौकात मोठी वाहतूक कोंडी होत होती. याबाबत अनेक तक्रारी महापालिकेकडे गेल्या होत्या, त्यानुसार मनपा बांधकाम नियंत्रण विभाग-2 च्या वतीने धडक कारवाई करीत या रस्त्यालगतची अतिक्रमण काढण्यात आली. एकूण 3.5 लक्ष चौरस फूट परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात आला. त्यामुळे कात्रज-कोंढवा रस्ता मोकळा झाला. अतिक्रमणे पुन्हा होऊ नयेत यासाठी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम तत्काळ करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
कात्रज-कोंढवा रस्त्यालगतची अतिक्रमण हटविण्याची कारवाई मनपा आयुक्त विक्रम कुमार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली. मनपा बांधकाम नियंत्रण विभाग-2, अतिक्रमण पथ, आकाशचिन्ह विभागाने मनपा पोलीस व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या बंदोबस्तात ही कारवाई केली. चार जेसीबी, दोन गॅस कटर, दोन ब्रेकर व 40 कर्मचारी यांच्या मदतीने कार्यकारी अभियंता राहुल साळुंखे, उपअभियंता प्रताप धायगुडे, शाखा अभियंता प्रशांत मोरे, हेमंत कोळेकर, अभिजित भुजबळ, संदेश पाटील यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे, अतिक्रमविरोधी विभागाच्या पोलीस निरीक्षक शबनम शेख यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईने अतिक्रमण व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
कात्रज-कोंढवा 84 मीटर रस्त्यातील व्यावसायिक बांधकामे, पत्राचे शेड अशी अतिक्रमणे हटविण्यात आली असून पक्क्या स्वरूपातील निवासी मिळकती यांना शासन नियमाप्रमाणे मोबदला देऊन ताबा घेऊन बांधकामे काढली जातील. कारवाई झालेल्या क्षेत्रावर पुन्हा अतिक्रमणे करू नयेत. प्रत्येक आठवड्याला नियमित कारवाई होणार आहे.
– राहुल साळुंखे,
कार्यकारी अभियंता, मनपा