ओबीसी आरक्षणानंतरही निवडणूक स्थगितच : जिल्ह्यातील इच्छुक संभ्रमात
पुणे/माळेगाव – राज्यात ओबीसी आरक्षण लागू केल्यानंतरही 17 जिल्ह्यांतील 92 नगरपरिषदा व चार नगरपंचायतींचा वाजलेला “बिगुल’ अद्यापही स्थगितच ठेवल्या असल्याने इच्छुक पुन्हा “गॅस’वर आले आहेत. यात पुणे जिल्ह्यातील 9 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींचा समावेश असून इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, जाहीर केल्याप्रमाणेच निवडणूक घ्यावी फक्त आरक्षणाची फेराफार करावी, अशी मागणी होत आहे.
राज्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम शुक्रवारी (दि. 8) जाहीर करण्यात आला होता; मात्र ओबीसी आरक्षणामुळे या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. मंगळवारी (दि. 19)
सर्वोच्च न्यायालयाने राज्यात 27 टक्के ओबीसी आरक्षण जाहीर केल्याने ओबीसी समाजामध्ये आनंद पसरला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निर्देशाप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षण वगळून राज्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता.
त्यानुसार 18 ऑगस्ट रोजी मतदान तर 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार होती; मात्र ओबीसी आरक्षण जाहीर झाल्यानंतर या 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये हे आरक्षण लागू करायचे की नाही याबाबा स्पष्टता नसल्याने राज्य निवडणूक आयोगाने या 92 नगरपालिका आणि चार नगरपंचायतींच्या आरक्षणाबाबतचा कोणताच निर्णय झाला नसल्याने या निवडणुका तुर्तास स्थगितच ठेवण्यात येणार असल्याचे पत्रकात नमूद केले आहे. तर उर्वरीत 115 नगरपरिषदा आणि 9 नगरपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केल्याने आधी बिगूल वाजलेल्या 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींमधील इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह?
राज्यात ओबीसी आरक्षण लागू झाले त्यावेळी राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण लागू करण्यापूर्वी राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणूक जाहीर केल्याचे न्यायालयाचा निदर्षनास आणून दिले नव्हते का, असा सवाल आता उपस्थितीत केला जात आहे.
या नगरपरिषदा, नगरपंचायत “गॅस’वर
नगरपरिषदा : राजगुरूनगर, चाकण, आळंदी, बारामती, दौंड, सासवड, जेजुरी, शिरूर, इंदापूर.
नगरपंचायत : माळेगाव, मंचर
येथे उत्साह संचारला
जुन्नर, लोणावळा, तळेगाव दाभाडे या तीन नगरपरिषदांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला असल्याने इच्छुकांमध्ये उत्साह संचारला असून त्यांचे निवडणूक तारखांकडे लक्ष लागले आहे.