मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जोरदार राजकीय हालचाली सुरु आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात असलेल्या सत्ताधाऱ्यांपासून ते सत्ता गमावलेल्या शिवसेना पक्षाबाबत आपले सडेतोड मत व्यक्त केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज यांनी सध्याची राजकीय परिस्थिती उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व आगामी महानगरपालिका याबाबत सविस्तरपणे भाष्य केलं आहे.
आजच्या राजकारणावर भाष्य करताना राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणात विचार राहिला नसल्याचे म्हंटले आहे. निवडून आल्यानंतर फुटणाऱ्यांना लोकांनी शासन करायला हवे अशी देखील इच्छा यावेळी राज यांनी व्यक्त केली. निवडणुकीच्या वेळी ज्यावेळी यांना धक्के बसतील त्यावेळी यांना समजेल परंतु असे होत नाही, जे काम करतात त्यांना जनता शासन करते, कितीही मतभेद असुद्या पण अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये काम केलं, अजित पवारांची सत्ता तेथून गेली तसच आमचं नाशिकच्या बाबत झालं असल्याचे देखील राज ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले.
आगामी काळात भाजपसोबत युती करणार का असा सवाल देखील यावेळी राज ठाकरेंना विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले,”आता मला याबाबत उत्तर देता येणार नाही. या जर-तर मधल्या गोष्टी आहेत. आम्ही पक्षामध्ये निवडणूक कशी लढवायची याचाच विचार करून पुढे जाणार असल्याचे ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले. कोणी युतीचा विचार करून पक्ष बांधायला घेतला तर पक्ष बांधलाच जाणार नाही, या आयत्या वेळी येणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे आपण जर तर मध्ये नको जायला ” असही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रातील राजकारण आणि सध्या असलेली राजकीय पक्षांची स्थिती याबाबत राज ठाकरेंनी सडेतोड पद्धतीने उत्तरे दिल्याचे यावेळी पाहायला मिळाले. आता इतर राजकीय नेते याबाबत काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.