आदिती तटकरे : विश्वराज हॉस्पिटलच्या उर्मी फर्टिलिटी सेंटरचे उद्घाटन
लोणी काळभोर – मातृत्वानंतर महिलामध्ये पोस्टपर्टम डिप्रेशन मोठ्या प्रमाणात येते. यात त्यांची मानसिकता ही संपूर्णपणे खचली जाते. नोकरी करणाऱ्या महिलांना अचानक बाळाचे संगोपण करण्यासही अडचण येते. त्यामुळेच राज्य सरकार या गंभीर विषयावरील धोरणावर गेल्या तीन वर्षापासून कार्य करीत आहेत. वैद्यकीय क्षेत्राने या संदर्भात जास्तीत जास्त कार्य करावे, असे मत महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले.
लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या उर्मी फर्टिलिटी सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अदिती कराड होत्या. यावेळी माईर्स एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, उर्मी फर्टिलिटी सेंटरचे संचालक डॉ. आशिष काळे व डॉ. अश्विनी काळे, डॉ. चंद्रकांत हरपाले, डॉ. कल्पना खाडे, कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच गौरी गायकवाड, लोणी काळभोरच्या उपसरपंच ललिता काळभोर आदी उपस्थित होते.
आदिती तटकरे म्हणाल्या, मातृत्व प्राप्त करणे महिलांच्या जीवनातील सर्वात मोठा सुवर्णक्षण असतो. लग्नानंतर तिला पुढील दोन चार वर्षात अपत्य झाले नाही तर कुटुंबाकडून “गुड न्यूज’ कधी हा प्रश्न वारंवार विचारला जातो. अशा वेळेस देवानंतर दुसरी अपेक्षा ही डॉक्टरांकडूनच असते. ते त्यांना नकारात्मकतेपासून सकारात्मकतेकडे घेऊन जातात. प्रत्येक हॉस्पिटल असे असावे की, जेथे गरीब रुग्णाला योग्य व माफक दरात उपचार मिळावाच; परंतु उच्च वर्गातील रुग्णाला सुद्धा ही जाणीव होऊ देऊ नये. त्याला त्याच्या सुविधांनुसार उपचार मिळत नाही. पण विश्वराज हॉस्पिटलमध्ये दोन्ही वर्गातील रुग्णासाठी योग्य अत्याधुनिक सुविधा आहेत.
सरकार आता बाल धोरणावर विशेष कार्य करीत आहेत. सध्याच्या काळात मुलांना सोशल मीडिया व मोबाइलची अधिक सवय झाली आहे. त्यांच्या जीवनात मोबाइल सोडून दुसरे विश्वच नाही. अशा वेळेस भविष्यातील पिढीसाठी बाल विभाग मोठ्या प्रमाणात कार्य करीत आहे.
डॉ. आशिष काळे म्हणाले आयव्हीएफ सेंटर संदर्भात समाजात बरेच गैरसमज होते परंतू काळानुसार ते कमी होतांना दिसत आहे. या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सेवा व तंत्रज्ञान उपलब्ध असल्याने त्याचा लाभ नक्कीच सर्वांना मिळेल. हर्षा पालवे यांनी सूत्रसंचालन तर डॉ संतोष पवार यांनी आभार मानले.
आजच्या काळात स्ट्रेस, वाईट सवयी, खाण्या पिण्याच्या सवयींचा परिणाम महिलांच्या शरीरावर होतांना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या हार्मोन्समध्ये बदल झाला आहे. ज्यांना मातृत्व हवे असेल अशा महिलांसाठी उर्मी आयव्हीएफ सेंटर नक्कीच लाभदायक ठरेल. येथे सेवाभावाची संस्कृती जपली आहे. उर्मी आयव्हीएफ सेंटर नक्कीच मातृत्वाच्या चेहऱ्यावर हास्य आणेल.
-राहुल कराड, कार्यकारी अध्यक्ष माईर्स एमआयटी
मातृत्व हा विषय केवळ त्या महिलेशी नाही तर संपूर्ण कुटुंबाशी निगडीत असतो. यावेळी त्या महिलेच्या मानसिकतेचा विचार करणे खूप गरजेचे आहे. उर्मी सेंटर नक्कीच सर्वांसाठी वरदान ठरणार आहे. तसेच स्त्रीला मातृत्व व पुरूषाला पित्याचा दर्जा देण्यासाठी कार्य करेल.
-डॉ. अदिती कराड, संचालक विश्वराज हॉस्पिटल