नागपूर : आज दसऱ्यानिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. दरवर्षीप्रमाणे अनेक राजकीय नेत्यांच्या भव्य सभेचे आज आयोजन करण्यात आले आहे. नागपूरमध्ये देखील आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी मोहन भागवत यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. यात त्यांनी मागील काही दिवसांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या असंतोषाबाबत देखील भाष्य केले आहे. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध गायक व संगीतकार शंकर महादेवन हे उपस्थित होते. सोबतच विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया हे देखील उपस्थित होते.
काय म्हणाले मोहन भागवत?
“मणिपूरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तिथे मैतेई व कुकी सोबत राहात होते. अचानक वाद कसा झाला? ते भारताचं सीमेवरचं राज्य आहे. तिथे असे वाद होणं यात कुणाचा फायदा आहे? बाहेरच्या शक्तींचाही फायदा आहे. देशाचं सरकार तिथे शांततेसाठी कटिबद्ध आहे. पण तरीही वाद चालू राहिले. कारण शांतीचा प्रयत्न चालू असतानाच कुठलातरी वाद निर्माण केला जात होता. ही हिंसा भडकवणारे लोक कोण होते? हे होत नाही, तर केलं जात आहे,” असे मोहन भागवत म्हणाले.
मणिपूरमधील स्थिती नियंत्रणात आणण्याबाबत मोहन भागवत यांनी भाष्य केले आहे. “तेथील लोकांची मनं दुखावली आहेत. आता समाजाला जोडण्याचंही काम करावं लागेल. संघाचे स्वयंसेवक आधीही तेच करत होते, आजही तेच करत आहेत. अशा स्थितीतही समाजात फूट निर्माण होऊ नये, यासाठी तिथे जिवावर उदार होऊन काम करत आहेत. मणिपूरमध्ये स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचा आम्हाला अभिमान आहे,” असं मोहन भागवत म्हणाले.
“फूट पाडणाऱ्या गोष्टींपासून समाजाने स्वतःला दूर ठेवावे”
यावेळी सरसंघचालकांनी मतदानावर देखील भाष्य केले. 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणूका होतील. निवडणुकीच्या रणधुमाळीत भावना भडकावून मते मिळवण्याचे प्रयत्न अपेक्षित नसले तरी ते होतच राहतात. समाजात फूट पाडणाऱ्या या गोष्टींपासून समाजाने स्वतःला दूर ठेवावे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्याचे प्रत्येकाने पालन करायला हवे. देशाची एकात्मता, अखंडता, अस्मिता आणि विकासाचे मुद्दे लक्षात घेऊन प्रत्येकाने मतदान करावे. जे पर्याय उपलब्ध आहेत, त्यातील सर्वात चांगल्या पर्यायाला मतदान करावे,” असे आवाहन देखील त्यांनी केले.