बारामती लोकसभा मतदारसंघासह राजकीय वर्तुळात विविधांगी चर्चेला उधाण
भाऊ ठाकूर
राहू – संपूर्ण राज्याचा राजकीय केंद्र बिंदू असलेला बारामती लोकसभा मतदार संघ हा सध्या वेगळ्याच विषयाने चर्चेत आहे. केंद्रीय राजकारणात उलथापालथ करण्याची ताकत असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघाकडे सध्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने जरा जास्तच लक्ष दिल्याने दौंड तालुक्याला बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघ हा शहरी व ग्रामीण मध्ये विभागाला गेला आहे. शहरी भागामध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघ येतो. परंतु बाकीचे पाच विधानसभा मतदारसंघ हे ग्रामीणमध्ये येतात. त्यामध्ये बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर व भोर हे मतदारसंघ येतात. यामध्ये फक्त दौंड विधानसभा मतदार संघात राहुल कुल हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत.
बाकी चार विधानसभा मतदार संघात प्रत्येकी दोन कॉंग्रेस व दोन राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यामुळे मिशन बारामती करत असताना दौंड हेच राजकीय केंद्र बिंदू राहणार आहे, हे मात्र निश्चित. मागील लोकसभेला भारतीय जनता पक्षाने दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती. त्यात त्यांचा जरी पराभव झाला असला तरी राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात कुल यांचे राजकीय वजन असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचा फायदा पुढील काळात दौंडकरांचे राजकीय वजन वाढण्यास होणार हे नक्की.
2019च्या लोकसभेला उशिरा उमेदवारी मिळूनदेखील कांचन कुल यांनी प्रस्थापितांना सळे की पळो करुन सोडले होते. त्यामुळे दौंड तालुका हा भविष्यात राजकीय केंद्रबिंदू राहिला तर नवल वाटायला नको.राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षामध्ये सर्वेसर्वा मानले जातात. आमदार कुल हे फडणवीस यांच्या मार्जितले मानले जातात. म्हणजे पुढील काळात मिशन बारामती असो की कोणतेही मिशन असो, त्यासाठी दौंड वरूनच जावे लागणार हे मात्र निश्चित.
नेमकी कोणाला संधी मिळणार?
बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपकडून कोणाला उमेदवारी दिली जाईल, याची आता उत्सुकता आहे. भाजपमधून अनेक नावांबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, प्रत्यक्षात नेमकी कोणाला संधी मिळणार? हे गुलदस्त्यात आहे. आज हर्षवर्धन पाटील यांच्यापासून वासुदेव काळे यांच्यापर्यंत अनेक नावांची भाजपमधून चर्चा सुरू आहे.
लढतही तुल्यबळ शक्य…
बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकायचाच, या दृष्टीने भाजपने तयारी सुरू केली आहे. या मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर सोपवून भाजपने डावपेच आखण्यास सुरूवात केली आहे. मात्र, अनेक लाटांमध्येही पवारांनी बारामतीचा गड कायम राखला आहे. त्यामुळे तो जिंकणे भाजपला तेवढेसे सोपे नाही. मात्र, तोडीसतोड उमेदवार दिल्यास बारामतीची लढतही तुल्यबळ होऊ शकते.