केवळ रिमझिम पाऊस : ओढे, नाले, बंधारे, विहिरी कोरड्याच
वाल्हे – राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे; मात्र पुरंदर तालुक्यातील वाल्हे व परिसरात पावसाने ओढ दिल्याने, ओढे, नाले कोरडे पडले आहेत. जवळपास सर्वच विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. तर ऐन पावसाळ्यात वाल्ह्याच्या पूर्वेकडील वाड्या-वस्त्यांवर टॅंकर सुरू असून, ऐन पावसाळ्यात टॅंकरचा पाणीपुरवठा कमी पडत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
वाल्हे व परिसरामध्ये जलयुक्त शिवार अंतर्गत अनेक मोठी कामे झाली आहेत; मात्र या परिसरात रिमझिम पावसाच्या सरी मागील आठवड्यापासून कोसळत असल्या तरी अद्याप कोठेही पाणीसाठा झालेला नाही. परिसरातील ओढे-नाले, छोटे बंधारे, धरणे मात्र पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. वाल्हे परिसरामध्ये मागील तीन वर्षांपासून ओढ्याला पूर सातत्याने येत आहे. मात्र चालू वर्षी मान्सूनपूर्व व मान्सून पावसाने ओढ दिल्यामुळे परिसरातील ओढे नाले पूर्ण आटलेले आहेत.
यामुळे विहिरींची पाणी पातळी खोलवर गेली असून काही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाल्हे परिसर व पिंगोरी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर धरणातील गाळ मागील काळात काढून खोलीकरण, रुंदीकरण मोठे नाले बांधणे, छोटे बंधारे साखळी बंधारे, सिमेंटचे बंधारे असे अनेक कामे लघुपट बंधारे विभाग, कृषी विभाग, शासकीय यंत्रणेच्या मदतीने टंचाई निवारण निधी, रीलीप फंड, स्वयंसेवी संस्था व खर्चातून झाली आहेत; मात्र, पावसाने ताण दिल्यामुळे सध्या परिसरातील ओढे-नाले पूर्णपणे कोरडे पडले असून शेतकरीवर्ग मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
बापसाई धरण कोरडेठाक
पिंगोरी येथील जय गणेश जलाशयात अत्यल्प पाणीसाठा असून या ओढ्यावरती वाल्हे गावाजवळील बापसाई धरण ही पूर्णपणे कोरडे पडले आहे. धरणातील गाळ काढून धरणाची खोलीकरण व रुंदीकरण ही केले आहे. यामुळे येथील ओढे – नाले कधी भरतात याची वाट शेतकरीवर्ग पाहत आहे.
पेरण्या आगाप-मागास
रिमझिम पावसाने परिसरातील खरीप पिकांच्या पेरण्या आगाप -मागास झाल्या आहेत. खरीप हंगामातील बाजरी, मूग, चवळी, भुईमूग, मूग, पावटा या पिकांना रिमझीम पावसाने तात्पुरता दिलासा मिळत असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले; मात्र परिसरातील विहिरींच्या पाणीसाठ्यात कोणतीही वाढ नसल्याने, वाल्हे व परिसरातील काही वाड्या-वस्त्यांवर टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे; मात्र पावसाने ताण दिला तर दुष्काळामुळे शेतकरी वर्ग कर्जाच्या ओझ्याखाली जाण्याची शक्यता असल्याची भिती शेतकरीवर्गामधून, व्यक्त होत आहे.