मंचर – येथे सर्व्हर डाऊन असल्याने नागरिकांना वेळेत महसुलाची कागदपत्रे मिळत नसल्याने तलाठी आणि नागरिकांमध्ये हमरीतुमरी होत आहे, तसेच प्रांत अधिकारी, तहसीलदार फेरफार निर्गमितीसाठी तगादा लावत आहेत.त्यामुळे सर्व तलाठी व मंडल अधिकारी यांना मानसिक त्रास होत असल्याने याबाबत त्वरीत दुरुस्ती व्हावी. अन्यथा तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना आंदोलन करावे लागेल, याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
तलाठी संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील दीड महिन्याच्या काळात सर्व्हर स्पीड कमी असल्याने कामे करताना अनेक अडथळे येत आहेत. कामे रात्री करावी लागतात. सर्व्हर योग्य काम करत नसल्यायाबाबत प्रकल्प समन्वयक रामदास जगताप यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले. मात्र एखादा दुसरा अपवाद वगळता अजूनही सर्व्ह वेग घेत नाही.
गुरुवार (दि. 24) ते सोमवार (दि. 28) या कालखंडामध्ये सर्व्हर बंद ठेवून पुणे जिल्ह्याचा डाटा नवीन सर्व्हरवर टाकण्यात आला असल्याचे व्हाट्स-ऍप ग्रुपवर रामदास जगताप यांनी सांगितले; परंतु तरीही सर्व्हरमध्ये काही सुधारणा झाली नाही, त्यानंतर गुरुवार (दि. 1) आणि शुक्रवार (दि. 2) डेव्हलपर्स राज्य समन्वयक यांनी 4 ते 7 तास मशीनच्या साह्याने स्पीड तपासणी केली. त्यानंतरही स्पीडमध्ये कोणतीच सुधारणा झाली नाही. सातबारा उतारा, आठ-अ उतारा, फेरफार, नकला यांचे वितरण करता येत नाही.
मंडल अधिकारी, तलाठी व खातेदार यांच्यामध्ये वाद होत असल्याचे पाहावयास मिळत आहे, त्यामुळे महसूल विभागाची प्रतिमा खराब होत आहे. जिल्ह्यात तलाठी कार्यालयांमधील तांत्रिक सुविधेतील बिघाडामुळे सर्व्हर स्पीड घेत नसल्याने अनेक कामे रखडली असून शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. दुरुस्ती होऊन सर्व्हर स्पीड वाढवावे, अन्यथा तलाठी आणि मंडल अधिकारी यांना आंदोलन करावे लागेल. याबाबतचे निवेदन तलाठी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना देण्यात आले आहे.