न्हावरे -रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने सन 2020-21 या वर्षीच्या गळीत हंगामासाठी साडेसात लाख मेट्रिक टन उस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष, आमदार अशोक पवार यांनी केले.
न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या 24व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाणपूजन कार्यक्रम गुरुवारी (दि. 8) पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून अशोक पवार बोलत होते.
याप्रसंगी शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रताप भोईटे, डॉ. दत्तात्रय कारंडे, संजय गायकवाड व पत्रकार संघाच्या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष योगेश मारणे या स्थानिक पत्रकारांच्या व कारखान्याचे संचालक, ज्येष्ठ शेतकरी बांधवांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. संचालक वाल्मिकराव नागवडे व त्यांच्या पत्नी लतिकाताई यांच्या हस्ते बॉयलरचे अग्निप्रदीपन करण्यात आले.
आमदार पवार म्हणाले, यावर्षीच्या गळीत हंगामासाठी घोडगंगाच्या कार्यक्षेत्रात गाळपासाठी उस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. गाळपाचे उद्दीष्ट पूर्ण केल्यास कारखाना पूर्वीप्रमाणे सुस्थितीत येऊन कारखान्याचे संस्थापक रावसाहेबदादा पवार यांचे स्वप्न साकार करता येणार आहे. सभासद हेच कारखान्याचे मालक आहेत. संचालक मंडळ हे विश्वस्त म्हणून कामकाज पाहत असते.
यावेळी घोडगंगाचे उपाध्यक्ष रंगनाथ थोरात, संचालक प्रा. सुभाष कळसकर, बाबासाहेब फराटे, संतोष रणदिवे, जगन्नाथ जगताप, अर्जुन कोंडे, सुदाम साठे, प्रशांत होळकर, बाळासाहेब ढमढेरे, उत्तम सोनवणे, पोपटराव भुजबळ, बिरा शेंडगे, शालन काळे, मनिषा सोनवणे, सचिन मचाले, दिलीप मोकाशी, नरेंद्र माने, रामअण्णा नागवडे, दत्तात्रय फराटे, अनिल वाबळे, कार्यकारी संचालक प्रविण शिंदे यांच्यासह पत्रकार, अधिकारी, कर्मचारी, सभासद, शेतकरी बांधव उपस्थित होते. कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक दिवंगत संभाजीराव पाटील यांना उपस्थितांच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. सूत्रसंचलन मंगेश ढवळे यांनी केले तर दिलीप मोकाशी यांनी आभार मानले.
मागील सरकारने कारखान्याबरोबर वीजखरेदी करार वेळेवर न केल्यामुळे कारखान्यास मोठा आर्थिक फटका बसला आहे. परिणामी कारखान्याला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्य सहकारी बॅंकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या माध्यमातून शासनस्तरावर प्रयत्न करून कारखान्याची नुकसानभरपाई भरून काढण्यासाठी संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत.
– आमदार अशोक पवार, अध्यक्ष घोडगंगा सहकारी साखर कारखाना