पिंपळवंडी – महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी नारायणगाव अंतर्गत असणार्या पिंपळवंडी (ता.जुन्नर) येथे डीपी बसविण्यासाठी मंजुरी असूनही महावितरण अधिकार्यांच्या गैरकारभारामुळे डीपी बसविण्यात आलेली नाही. दोन वर्षांपूर्वी पिंपळवंडी येथे डीपी बसविण्यात यावी यासाठी ग्रामपंचायत, यशवंत नागरी पतसंस्था, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे यांनी महावितरणला लेखी पत्र दिले होते.
त्यासाठी खासदार निधीतून पैसेही वर्ग करण्यात आले होते; परंतु महावितरणच्या अधिकार्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून सुरक्षेच्या कारणास्तव आज तागायत डीपी बसविण्यासाठी हलगर्जीपणा केला आहे. महावितरणने ठेकेदारामार्फत पिंपळवंडी येथील यशवंत उद्यानामध्ये डीपी उभी करण्यासाठी खड्डे घेऊन पोल उभे केले होते. त्यासाठी लागणारे ताण रोवण्यात आले होते; परंतु अचानकपणे ठेकेदाराने तिथे उभे केलेले लोखंडी पोल ग्रामपंचायतला पूर्वकल्पना न देता क्रेनच्या साह्याने उचलून नेले.
पिंपळवंडी येथे यशवंत उद्यानात डीपी उभी करण्यासाठी रितसर परवानगी असूनही तिथे उभे करण्यात आलेले पोल ठेकेदाराने कोणाच्या सांगण्यावरून काढून नेले हे कळू शकले नाही. सुरक्षेच्या कारणासाठी डीपीसाठी उभे केलेले पोल काढून नेले असतील तर ज्या ठिकाणी पोल उभे करण्यात आले होते ती जागा अत्यंत सुरक्षित होती. असे असतानाही ठेकेदाराने डीपीसाठी उभे केलेले पोल कोणाच्या सांगण्यावरून काढून नेले हे कळू शकले नाही. ठेकेदार हांडे यांच्याशी वारंवार फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याने फोन उचलला नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार
जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे व यशवंत नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव वाघ हे महावितरणच्या गैरकारभारामुळे नाराज आहेत. पुढील आठवड्यात यशवंत नागरी पतसंस्थेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपळवंडी येथे येणार असून त्यावेळी महावितरणच्या अधिकार्यांची लेखी तक्रार महादेव वाघ हे पवारांकडे करणार आहे.
यशवंतचे आर्थिक नुकसान
यशवंत नागरी पतसंस्थेने संस्थेची आर्थिक बचत होण्यासाठी सोलर पॅनलच्या माध्यमातून स्वतःची वीज निर्मिती प्रकल्प उभा केला. त्यातून दररोज 100 ते 150 युनिट वीज तयार होते. परंतु तयार होणारी वीज डीपी नसल्यामुळे महावितरणला एक्सपोर्ट होत नाही. त्यामुळे संस्थेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे डीपीची मंजुरी असूनही महावितरण डीपी बसविण्यास टाळाटाळ करीत असल्याने झालेल्या आर्थिक नुकसानीची महावितरण भरपाई देणार का? असा प्रश्न यशवंत पतसंस्थेचे अध्यक्ष महादेव वाघ यांनी उपस्थित केला आहे.