जानेवारीच्या सुरुवातीलाच पाणीसाठा संपुष्टात येण्याची भीती
निमसाखर (वार्ताहर) – खोरोची (ता. इंदापूर) येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्या मधुन होत असलेल्या गळतीमुळे सध्या पाणी पातळीमध्ये मोठी घट होत आहे. याचबरोबर बंधाऱ्यावर पडलेला तो खड्डा प्रवाशांसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे या बंधाऱ्याची गळती थांबवावी आणि तो खड्डा दुरुस्ती करून बंधाऱ्यात पाणी सोडण्यासाठी संपदा खात्याने नियोजन करावे अशी मागणी या भागातील नागरीकांनी केली आहे.
या वर्षी झालेल्या मुबलक पाऊसामुळे पाण्याची कमतरता भासणार नाही, अशी अपेक्षा होती; मात्र सध्या नीरा नदीवरील बंधाऱ्यांवरची परिस्थिती काहीशी वेगळीच आहे. सध्या बंधाऱ्यांच्या एका बाजूला साधारण 40 ते 45 टक्के पाणीसाठा
उपलब्ध आहे.
खोरोची येथील बंधाऱ्याच्या एकूण नऊ टप्यांपैकी पाच ढापे उघडे पडले असल्याने हा पाणीसाठा जानेवारीच्या सुरुवातीलाच संपुष्टात येण्याची शक्यता परिसरातील शेतकऱ्यांमधून वर्तवली जात आहे. खोरोची येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये 40 टक्के पाणीसाठा आहे. हा साठा केवळ परिसरातील शेतीसाठी उपसा सुरू झाल्यास केवळ 20 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा आहे. यामुळे जलसंपदा खात्याने बंधारा भरुन द्यावा, अशी मागणी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राहुल कांबळे यांनी केली आहे.
खोरोची बंधाऱ्यामधून पाणी गळती होत असल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली असून ही गळती थांबविण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच गळती थांबवण्यात येईल. तर शेतकऱ्यांच्या मदतीने कालव्याद्वारे बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्याचे प्रयत्न करीत आहोत.
– विजय यादव, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग निमगाव केतकी