विनोद गायकवाड
कुरकुंभ – जागतिक पटलावर ठळकपणे अधोरेखित झालेल्या कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कंपनीत वर्षभरात सुमारे 7 स्फोट होत आहेत. कुरकुंभकर दररोज मरणाच्या दारातून घरी परतत आहेत. त्यामुळे स्फोट आणि आगीचे सख्ख्य असलेल्या कुरकुंभकरांच्या नशिबी घात- पातच कोरले आहे. औद्योगिकरणाच्या नावाखाली दिल्लीपासून कुरकुंभपर्यंत संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा दावणीला बांधली आहे. यात पर्यावरणाला तिलांजली दिली जात आहे. याकडे अधिकारी, कंपन्या नियमांना हरताळ फासत आहेत.
1989 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी दौंड तालुक्यातील कुरंकुभ येथे औद्योगिक वसाहतीची स्थापना केली. गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. काही रक्कम शेतकऱ्यांच्या हातावर टेकविण्यात आली. परिसरात रासायनिक प्रकल्प सुरू होऊन तीस वर्षे पूर्ण होत आहे.
मात्र, औद्योगिक वसाहत नेहमीच प्रदूषण, आग, स्फोट यासाठी महाराष्ट्रात चर्चेत राहिली आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये एकूण 264 कंपन्यांपैकी सरासरी 70 कंपन्या केमिकलशी संबंधित आहेत. यातील केमिकल कंपन्यांची उत्पादित टक्केवारी ही 60 ते 70 टक्क्यांवर आहे. एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये दुर्घटना होतात.
यामध्ये रॅक्टर फुटणे, बॉयलरचा स्फोट, साठवून ठेवलेल्या केमिकलला अचानक आग लागणे आदी घटना नित्याच्याच झाल्या आहेत. औद्योगिक सुरक्षा विभागाचे उपसंचालक अखिल घोगरे यांनी या प्रकरणी कंपनीचे मालक कल्पेश ठक्कर यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, दुर्घटनेनंतर अधिकाऱ्यांकडून कारवाईचा इशारा दिला जात आहे.
त्यापूर्वी कंपन्यांना नियमांचे पालन करावयास लावून त्यांना ताळ्यावर आणण्याची धमक अद्याप कोणीही दाखविली नाही. तीन वर्षांपूर्वी एका कंपनीत दुर्घटना घडल्यानंतर दिल्लीतून सत्ताधारी पक्षातील एका वजनदार नेत्याचा दूरध्वनी आला. त्यानंतर ही फाईल आजतागायत उघडली नाही. तालुक्यातील लोकप्रतिनिधींकडून याबाबत आवाज उठविला आहे. मात्र, त्यांचा आवाज कोठे क्षीण होतो, याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
कंपन्यांचे अंतर्गत बाह्य सुरक्षेकडे दुर्लक्ष
देशात कायम चर्चेत असलेली कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये केमिकल कंपन्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. त्यामुळे या ठिकाणी बहुराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. सौंदर्य प्रसाधने, औषध निर्मितीसह अनेक कंपन्या आहेत. यातील काही कंपन्या नियम पायदळी तुडवून उत्पादन घेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे याठिकाणी स्फोट, आग आदी दुर्घटना गावकऱ्यांच्या पाचवीलाच पुजल्या आहेत.
त्यामुळे येथील कामगार मृत्यूच्या दारात काम करीत आहेत. मात्र, कंपनी व्यवस्थापनाला त्याची फिकीर नाही,त्यामुळे स्थानिक नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे. कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांच्या तलवारी म्यान होत आहेत. असे प्रकार अनेकदा घडले आहेत. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे काय, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे.
प्रशासन, शासन दरबारी अनेकवेळा तक्रारी करून अक्षरशः गावकरी देखील वैतागून गेले आहेत. मात्र, प्रशासन त्यांची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडताना दिसत नाहीत.त्यामुळे एखाद्या कंपनीस आग लागली तर लोक घाबरून घर सोडायला लागली आहेत, यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी.
– राहुल भोसले, सरपंच, कुरकुंभ.