काटेवाडीतील शेतकऱ्याचे सुमारास साडेसात लाखांचे नुकसान
भवानीनगर – काल झालेल्या जोरदार वाऱ्यासह पावसामुळे काटेवाडी येथील प्रकाश गरदडे यांच्या दोन एकर केळीचे साडेसात लाख रुपयांचे आर्थिक नुकसान.
रविवारी (दि. 5) सायंकाळी सहा वाजता अचानक आकाशामध्ये ढग जमा होऊन जोराचा वारा वाहू लागला त्याचबरोबर थोड्याच वेळात जोरदार पावसाने सुरुवात केली. या वाऱ्याबरोबर मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने काटेवाडी (ता. बारामती) येथील प्रकाश गरदडे यांच्या शेतामधील दोन एकर केळीच्या बागेचे नुकसान होऊन अनेक झाडे जमीनदोस्त झाली आहेत.
गरदडे यांनी एक वर्षापूर्वी त्यांच्या दोन एकर शेतामध्ये जैन जीनाईन जातीच्या केळीची लागवड केली. दोन एकरामध्ये 2500 रोपांची लागवड केली. केळीच्या लागवडीअगोदर शेतीची मशागत त्याचबरोबर केळीची रोपे, शेनखत इतर रासायनिक खते, मजुरांचा खर्च, त्याच बरोबर केळीला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन अशाप्रकारे आज पर्यंत केळीसाठी दोन ते अडीच लाख रुपये खर्च झाला आहे.
केळीची बाग लावल्यापासून साधारण दहा ते बारा महिन्यानंतर केळी बाजारात विक्रीसाठी तयार होते. केळीच्या झाडांना केळी लागलेली असताना अचानक वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने दोन एकर बागेतील अनेक झाडे जमीनदोस्त झाल्याने साडेसात लाख रुपयांचे आर्थिक नुकसान प्रकाश गरदडे यांचे झाले आहे.
एकरी 25 टन याप्रमाणे दोन एकरात मधील केळीचे उत्पादन 50टन निघाले असते. सध्याच्या बाजारपेठेतील दराप्रमाणे किलोला 15 रुपये याप्रमाणे साडेसात लाख रुपये 50 टन केळीचे झाले असते; परंतु काल झालेल्या वाऱ्यासह पावसामुळे केळीच्या बागेचे नुकसान झाल्याने प्रकाश गरदडे यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. दोन ते अडीच लाख रुपये झालेला खर्च वजा जाता साडेसात लाखा पैकी साडेचार ते पाच लाख रुपये एवढे आर्थिक उत्पन्न या शेतकऱ्याला मिळाले असते.