लोणी धामणी – शरयू नदीत वाहून आलेली प्रेते, बाबरी मशिदीचे ढाचे पडताना भिंती खाली मृत्यूमुखी पडलेले अनेक कारसेवक. धामणी ते अयोध्या प्रवासात आलेल्या प्रचंड अडचणी, खाण्या पिण्याचे झालेले हाल..
अन् घरी आल्यावर पोलिसांनी दिलेला त्रास असे अनेक प्रसंग सांगताना धामणी (ता. आंबेगाव) येथील ’श्रीराम रंगी रंगले’ कार्यक्रमात कारसेवकांना अश्रू अनावर झाले. तर समोर बसलेल्या ग्रामस्थांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.
आज अयोध्यानगरीत श्री प्रभू रामाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशातील प्रत्येक गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने धामणी (ता. आंबेगाव) येथेही ’श्रीराम रंगी रंगले महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने संपूर्ण गावात भगवे ध्वज लावण्यात आले होते व रस्त्यावर भव्य रांगोळी काढण्यात आली होती.
सकाळी 6.30 वाजता श्रीराम मंदिरात अभिषेक करण्यात आला. आठ वाजता गावातील बाजारपेठेतून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने महिला, तरुण, ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन कऱण्यात आले व शालिनी महाराज निवृत्ती देशमुख इंदोरीकर यांचे कीर्तन व सायंकाळी शोभा यात्रा असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
1992 साली अयोध्येमध्ये बाबरी मशिद उद्ध्वस्त करण्यास गावातून कुर्मदास भूमकर, सुभाषनेते जाधव, राजेंद्र जाधव, चंद्रकांत जाधव हे चार कारसेवक गेले होते. आज साडेपाचशे वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले. या निमित्ताने आयोजित सत्कार कार्यक्रमात जुन्या आठवणी सांगताना कार सेवकांचे डोळे पाणावले. कार्यक्रमाचे आयोजन धामणी, पहाडदरा शिरदाले, ज्ञानेश्र्वर वस्ती ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते.