मुंबईत आझाद मैदानात आंबेगावातील शेतकऱ्यांचे उपोषण सुरू
मंचर – खेड तालुक्यातील कळमोडीचे पाणी आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील शेतकऱ्यांच्या शेतीला मिळावे. यासाठी येथील शेतकऱ्यांनी मुंबई येथील आझाद मैदान येथे आजपासून (26 जून) उपोषण सुरू केले आहे.
आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागाला कलमोडी धरणाचे पाणी शेतीला मिळावे तसेच 370 शेतकऱ्यांचे 335 हेक्टर क्षेत्र सातबारा उतारावरील शिक्के त्वरित काढावेत व हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे) धरणातून जुन्नर तालुक्यातील माणिकडोह धरणात काढण्यात येणाऱ्या बोगद्याला विरोध म्हणून शिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेचे माजी गटनेते देविदास दत्तात्रय दरेकर व रवींद्र तुकाराम तोत्रे यांच्या नेतृत्वाखाली सातगाव पठार भागातील शेतकऱ्यांनी उपोषण सुरु केले आहे.
सातगाव पठार भागातील कुरवंडी, भावडी, कोल्हारवाडी, थुगाव, कारेगाव, श्रीरामनगर, पेठ, पारगाव तर्फे खेड (ता. आंबेगाव) कडधे, कान्हेवाडी, फापळवाडी मिरजेवाडी, मोहकल, चास- कमान, वाफगाव, गुळाणी (ता. खेड) पाबळ, थिटेवाडी, परिसरातील गावे (ता. शिरूर) आदि गावांचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कळमोडी धरणामुळे सुटणार आहे. पण धरणाचे पाणी मिळण्यासाठी कार्यवाही होत नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
कळमोडी धरणाचे पाणी सातगाव पठार भागाला मिळालेच पाहिजे अश्या घोषणा या वेळी शेतकऱ्यांनी दिल्या. या उपोषणात विजय राम घोडेकर, दिलीप महादू चासकर, सुबोध सीताराम आवटे, संजय ज्ञानेश्वर तोडकर, सूर्यकांत किसन ढमाले, यशवंत झुरंगे, श्याम गुंजाळ, राजेंद्र शेवाळे, श्याम शेवाळे, अनिकेत शेवाळे, दिनेश आढळराव आदि शेतकरी सहभागी झाले आहेत. शिवसेनेचे युवा सेनेचे राष्ट्रीय समन्वयक सचिन बांगर, युवासेना जिल्हाधिकारी प्रवीण थोरात पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना पाठिंबा व्यक्त केला.
कळमोडीचे पाणी सातगाव पठार भागाला देण्यास टाळाटाळ केल्यास व डिंभे धरण हुतात्मा बाबू गेनू सागराच्या बोगदाद्वारे नगर जिल्ह्यात पाणी पळविण्याचा प्रयत्न झाल्यास कळमोडी किवा हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे) धरणात आम्हाला जल समाधी घेतल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार तातडीने करावा.
-देविदास दरेक, माजी गटनेते, जिल्हा परिषद पुणे
विकता येईना, पिकवताही येईना..
देविदास दरेकर म्हणाले, कळमोडी धरणाची निर्मिती सातगाव पठार, खेड व शिरूर तालुक्यातील काही गावांसाठी झाली आहे. 12 वर्षापूर्वी धरण झाले आहे. सातगाव पठार भागातील अनेक शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर पुनर्वसन खात्याचे शिक्के आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही बॅंक कर्ज देत नाही. खातेफोड होत नाही. खरेदी विक्रीचे व्यवहार करता येत नाहीत. शेतीला धरणाचे पाणीही मिळत नाही, अशा दुहेरी संकटात येथील शेतकरी राजा गेली अनेक वर्षे संघर्ष करत आहे. पण आश्वासनाशिवाय काहीच पदरात पडले नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांत प्रचंड नाराजी आहे.