रात्री उशिरापर्यंत अनेक आंदोलक पाण्यातच बसून
इंदापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सराटी येथे नीरा नदीच्या पात्रामध्ये मराठी बांधवांनी जलसमाधी आंदोलन मंगळवारी दिवसभर केले.
बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील अनेक मराठा बांधव सदरच्या जलसमाधी आंदोलनात सहभागी झाले. जिल्हाधिकारी तसेच प्रांत अधिकारी व शासकीय अधिकारी यांनी आंदोलकांशी संवाद साधला; परंतु रात्रीपर्यंत अनेक आंदोलक पाण्यातून बाहेर आले नाहीत.
मराठा समाजास आरक्षण मिळावे म्हणून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत चालली असून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची शासनाने दखल घेऊन मराठा समाजास तात्काळ आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी या जलसमाधी आंदोलनप्रसंगी मराठा आंदोलनकर्त्यांनी केली.
नीरा नदी पात्राचा परिसर मराठा युवकांनी दिलेल्या आरक्षणाच्या घोषणांनी दुमदुमून गेला. या आंदोलनामुळे नीरा नदीला अक्षरशः यात्रेचे स्वरूप आले होते.