रमेश जाधव
रांजणी – गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बिबट्यांचे माणसांवरील वाढते हल्ले ही चिंताजनक बाब बनली आहे. सद्यस्थितीत ग्रामीण भागात मानवी वस्तीवर बिबट्यांचे वाढत चाललेले वास्तव्य आणि हल्ले या पार्श्वभूमीवर वन विभागाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. भविष्यात बिबट्यांची संख्या वाढतच राहिल आणि माणसांवरील हल्ले देखील असेच सुरू राहिले तर ग्रामीण भागातील नागरिकांना जगणे देखील कठीण होऊन बसेल.
काही वर्षांपासून बिबट्यांच्या संवर्धना संदर्भात वनविभाग जरी प्रयत्न करत असले तरी वन विभागाला अद्यापही त्याबाबत यश मिळालेले नाही. उलट बिबट्यांचे माणसांवरील हल्ले हे वाढतच चालले आहे. सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे त्यामुळे बिबटे उसाच्या शेतात वास्तव्य करत होते; मात्र ऊस तोडणीमुळे आता बिबटे सैरभैर होऊ लागले आहे. साहजिकच उसाच्या क्षेत्रातून बिबटे मानवी वस्तीवर येऊन लागले असून त्यांचे माणसांवरील होणारे हल्ले ही खरोखर चिंतनीय बाब बनली आहे.
आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. शेतकर्यांना शेतीची कामे करत असताना बहुतेकदा दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत आहे. या भागातील शेतकर्यांना जीव मुठीत धरून शेतीची कामे करावी लागतात तसेच रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.
वन विभागामार्फत बिबट प्रवण क्षेत्रात नेहमीच जनजागृती सप्ताह केला जातो; परंतु वाढत्या बिबट्यांच्या संख्येच्या बाबतीत काय निर्णय घेतला जातो, हे कळू शकत नाही. या भागातील बहुतेक लोक व्यवसाय कामानिमित्त शहरी भागात वास्तव्यात आहे. सणानिमित्त ते गावाला येत असतात; परंतु सद्य परिस्थिती पाहता या भागातील नागरीक बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याने आपली लहान मुले घेऊन गावाकडे येण्यास घाबरत आहे.
जंगलात राहणारा बिबट्या आपलं घर म्हणून उसाच्या शेतात राहू लागला, त्याला ऊस शेती हेच जंगल वाटू लागल्याने त्याच ठिकाणी बिबट्याचे प्रजनन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसत आहे.
बिबट्याने जन्म दिलेल्या बछड्याला देखील ’उसाची शेती सुरक्षित आणि आपलं घर वाटू लागलं’ आहे. बिबट्याच्या वाढत्या प्रजननामुळे बिबट्याच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे बिबटे मानवी वस्तीकडे अन्नाच्या व पाण्याच्या शोधात येऊ लागले तेथूनच बिबट आणि मानवाचा संघर्ष सुरू झाला.
बिबट्याच्या हल्ल्यामध्ये काही नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. मृत झालेल्या व्यक्तीला शासनाकडून आर्थिक मदत केली जाते. पण हल्ल्यात गेलेली व्यक्ती पुन्हा येत नाही त्यामुळे गेलेल्या व्यक्तीची किंमत पैशात होऊ शकत नाही. बिबट्या या समस्येवर शासनांने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे, यासाठी शासन स्तरावर माणव आणि बिबट्याही सुरक्षित राहिला पाहिजे यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची गरज आहे.
बिबट्या हवा की माणूस?
पाळीव प्राणी व माणसांवर वारंवार होणार्या बिबट हल्ल्यामुळे शेतीची कामे करणे अवघड झाले आहे. दिवसा ढवळ्या बिबट्यांचा वावर वाढला आहे. सद्यपरिस्थिती पहाता या भागात पाळीव कुत्र्यांपेक्षा बिबट्यांची संख्या जास्त आहे.
वनविभागाने आता तरी माणसांवर बिबट हल्ले होण्याची वाट पाहु नये. वनविभागाने यावर गांभिर्याने विचार करणे गरजेचे आहे. यावर वन विभागाने ठोस पावले उचलून बिबट्या हवा की माणूस? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
बिबट्याच्या संख्येचे नियोजन काय?
’बिबट्यासोबत जगा’ असे वनविभागा कडून जनजागृतीच्या माध्यमातुन सांगण्यात येते. बिबट्याचे माणसांवर हल्ले का होतात? पकडलेले बिबटे कुठे सोडले जातात? कारण ते पुन्हा मानव वस्तीत आढळून आले आहेत.
काही भागात 4-5 बिबटे टोळीने फिरतात. दिवसाढवळ्या अचानक समोर येतात वाढत्या बिबट्याच्या संख्येचे काय नियोजन आहे? बिबट सफारी प्रकल्पाचे काय झाले? मागणी करूनही शेतकर्यांना दिवसा वीजपुरवठा का केला जात नाही? असे अनेक प्रश्न अनुत्तरीतच आहेत.