नीलकंठ मोहिते
रेडा -इंदापूर तालुक्यातराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्त्वाखाली विकास कामांबरोबरच सामाजिक कार्यावर पदाधिकारी भर देत आहेत. त्यासाठी भरणे यांच्यासह जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापाती प्रवीण माने पायाला “भिंगरी’लावल्याप्रमाणे तालुक्यातील सामन्य नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी अखंडपणे फिरत असल्याने तालुक्यात “घड्याळा’चे काटे सुसाट वेगाने धावत असल्याचे चित्र दिसत आहे.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सलग दोनवेळा केवळ सामान्य मतदारांच्या जोरावर इंदापूर विधानसभा जिंकली. त्यामुळे सामान्य नागरिकांची असलेली नाळ व विकासकामांबाबतचा त्याचा ओढा अजिबात ढळलेला नसून आणखी वाढतच आहेत. इंदापूर तालुक्यातील 25 ते 30 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचे गणित सोडविण्यासाठी त्यांनी जोर दिला आहे.
जलसंपदा विभागाच्या माध्यमातून अभिनव योजना, राबवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून तालुक्यात निधी देण्याचे काम सुरू केले आहे. तालुक्यातील एकाही शेतकऱ्याची जमीन पाण्यावाचून पडीक राहणार नाही. याची खबरदारी घेण्याची मोहीम हाती घेतली आहे.
शेटफळ हवेली, वाघाळे तलाव, उपसा जलसिंचन योजना, नीरा नदीवरील, भीमा नदीवरील बंधारे या सर्व कामांना जलसंपदा विभागाचा निधी देण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत बैठका घेऊन, तात्काळ काम सुरू करण्यासाठी राज्यमंत्री भरणे यांनी मेहनत घेतली आहे. राष्ट्रवादीच्या माध्यमातून प्रदीप गारटकर यांनी जिल्ह्यामध्ये पक्षवाढीसाठी, मजबूत दर्जेदार नियोजन केल्यामुळे मजबूत पक्षसंघटन निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य तथ माजी सभापती प्रवीण माने हे गेल्या अनेक वर्षांपासून अविरत, सामाजिक कार्य करत आहेत. यामध्ये विविध विकास कामात, पळसदेव-बिजवडी जिल्हा परिषद गट विकास कामात आघाडीवर आहे. भरणे, गारटकर, माने हे त्रिकुट इंदापूरच्या विकासाठी आहोरात्र झटत असून नागरिकांच्या सुख दुःखात सहभागी होऊन कार्य करीत असल्याने तालुक्यात राष्ट्रवादीचा जनाधार अधिक वाढत असल्याने ही विरोधकांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे-पाटील, कार्याध्यक्ष अतुल झगडे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा छाया पडसळकर यांनी तालुक्यात पक्षसंघटन संदर्भात प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरीव कामकाज केले आहे. जिल्हा परिषद सदस्या वैशाली पाटील यांनी वालचंदनगर जिल्हा परिषद गटांमध्ये कायम विकास कामाची गती ठेवली आहे. भिगवण, भवानीनगर, सणसर भागातील उर्वरित राहिलेली विकास कामे मार्गी लागत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून समाजोपयोगी कामांचा निपटारा योग्य दिशेने सुरू असल्यामुळे आगामी काळात पक्षाला चांगले दिवस येणार आहेत.
झोपडीतल्या कुटुंबांना राज्यमंत्र्यांचा आधार
तब्बल पाच ते सहा महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या खात्याचे राज्यमंत्री म्हणून दत्तात्रेय भरणे काम करीत आहेत. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. तरीदेखील इंदापूर तालुक्यातील सामान्य कुटुंबांना व झोपडीत राहणाऱ्या नागरिकांना ते विसरलेले दिसत नाहीत. थेट राज्यमंत्री भरणे यांच्याशी तालुक्यातील गरीब नागरिकांचा संपर्क असतो. त्यामुळे एका फोनवर कामे मार्गी लावण्याची किमया मंत्री भरणे करत आहेत. याचा झोपडीतील कुटुंबांना राज्यमंत्री भरणे यांचा मोठा आधार मिळत आहे.