आढळराव पाटील : मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष
राजगुरूनगर – महाराष्ट्र राज्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक ही मोठी लढाई आहे. ती जिंकण्यासाठी शिवसंकल्प अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत मिशन 48 हा आमचा संकल्प आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजगुरूनगर येथे शनिवारी (दि. 6) पहिली मानाची सभा होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे उप नेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
राजगुरूनगर जवळ पुणे-नाशिक महामार्गावरील पानमळा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची भव्य सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सभेच्या मैदानाची गुरुवारी (दि. 4)पाहणी केली. त्यांच्या समवेत जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, जिल्हा संघटक अशोक भुजबळ, तालुका प्रमुख राजू जवळेकर, मारुती सातकर, किरण आहेर, महेश शेवकरी, विजय शिंदे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, बांधकाम विभागाचे जयंत कचरे, शरद मोटे, राजगुरूनगर नगर परिषेदेचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांच्यासह अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री सभा मैदानाची पाहणी केल्यानंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, राज्यात लोकसभेच्या 48 जागा लढवायच्या असून त्यातील 45 जागा जिंकायच्या आहेत. शिरूर लोकसभेवर अनेकांनी दावे ठोकले आहेत. सत्तेतील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिघेही आपापल्या परीने जागेबाबत बोलत आहेत; मात्र राज्यातील कोणत्या जागा कोणाला द्यायच्या हा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. शिरूर मतदारसंघाची जागा ज्यांना जाईल त्यांचे आम्ही काम करू, असे त्यांनी नमूद केले.
आढळराव म्हणाले की, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काढलेल्या आक्रोश मोर्चात 90 पेक्षा जास्त लोक नव्हतेच हे महाराष्ट्राने पाहिले आहे. तो केवळ जोक होता. शेतकर्यांच्या कळवळा त्यांना कधी आला. शेतकर्यांची दुःख कधी कोल्हे यांनी समजून घेतली नाहीत. शेतकर्यांच्या काय भावना आहेत काय दुःख आहे. हे त्यांना माहिती नाही आता निवडणूक आली म्हणून आक्रोश मोर्चा काढला.
चार चांगली भाषणे केली, डरकाळ्या फोडल्या म्हणजे जनतेचे प्रश्न सुटत नसतात. त्यासाठी जनतेची सुखदुःखे जाणून घेतली पाहिजेत, लोकांना कळून चुकले आहे खरा आक्रोश कशासाठी आहे ते, असा टोला माजी खासदार आढळराव पाटील यांनी विद्यमान खासदार डॉ कोल्हे याना लगावला. गेली 15 वर्षात आम्ही शिरूर लोकसभा मतदार संघातील गावागावात दौरे करून शेतकर्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे दुःख, वेदना पहिल्या आहेत त्यासाठी आवाज उठवला आहे.
‘तो गल्लीबोळातील मोर्चा’
खासदार डॉ. कोल्हे यांच्या आक्रोश मोर्चावर बोलताना माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले, तो आक्रोश मोर्चा नव्हताच. अनेक ठिकाणी त्याला शेतकरी व नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला तो आक्रोश मोर्चा नसून तो गल्लीबोळातील मोर्चा होता, अशी खिल्ली माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उडवली.
हे मान्यवर राहणार उपस्थित
राजगुरूनगर येथे होणार्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला उद्योगमंत्री उदय सामंत, डॉ निलम गोर्हे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेचे नेते, जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, जिल्हा संघटक अशोक भुजबळ, तालुका प्रमुख राजू जवळेकर व शिंवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.