वाघोली : पुणे जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनाने संपूर्ण वाघोली गावासाठी अनेक वर्षांपासून चालू असलेल्या योजनेचे पाणी सध्या दूषित स्वरूपाचे येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
भीमा नदीच्या जलपात्रात वाघोली आणि पंचक्रोशीतील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा करणाऱ्या अनेक पेयजल योजना खूप वर्षांपासून कार्यान्वित आहेत, मात्र गेल्या काही दिवसांपासून भीमा नदीचा प्रवाह एका जागी स्थिर असल्याने दुर्गंधीयुक्त व पिण्यास घातक पाणी सध्या वाघोली आणि पंचक्रोशीतील अनेक गावांना मिळू लागल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
पाणी शुद्धीकरणाची अनेक संयंत्र देखील या पाण्यापुढे हतबल झाली असून तातडीने नदीपात्रात पाणी सोडून प्रवाह पूर्ववत करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
वाघोली गावासाठी असणाऱ्या पाण्याचे योजनेतून मोठ्या प्रमाणात दूषित पाणी येत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नदीपात्रातील पाणी पूर्ववत करण्यासाठी जिल्हा प्रशासन व पुणे मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
-रामभाऊ दाभाडे, माजी सदस्य, जिल्हा परिषद पुणे