पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 9 हजार 842 विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी 187 विद्यार्थ्यांचेच प्रवेश झाले आहेत.
राज्यात “आरटीई’ अंतर्गत 9 हजार 331 शाळांमध्ये 1 लाख 15 हजार 460 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करण्यात झाल्या आहेत. यासाठी 2 लाख 91 हजार 368 पालकांनी आपल्या मुलांचे ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. प्रवेशासाठी राज्यस्तरीय लॉटरी काढण्यात आली असून यात 1 लाख 926 मुलांचा नंबर लागलेला आहे. 75 हजार 465 मुलांचा प्रतिक्षा यादीत समावेश करण्यात आलेला आहे. आतापर्यंत एकूण 57 हजार 101 विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये तात्पुरते प्रवेश घेतले आहेत. 60 हजार 797 विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाले आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये प्रवेशासाठी गर्दी होऊ नये म्हणून टप्प्याटप्प्याने प्रवेश घेण्याच्या तारखा पालकांना दिल्या जात आहेत. शाळांमध्ये जावून प्रत्यक्ष प्रवेश घेण्यासाठी आधी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर आता 15 सप्टेंबरपर्यंत ही मुदत वाढवण्यात आलेली आहे.
पुणे जिल्ह्यातील 972 शाळांमध्ये 16 हजार 949 प्रवेशाच्या जागा आहेत. या जागांसाठी 62 हजार 919 अर्ज आले आहेत. 16 हजार 617 मुलांना प्रवेशाची लॉटरी लागलेली आहे. त्यातील 9 हजार 974 मुलांचे तात्पुरते प्रवेश झाले आहेत. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील प्रवेशाचा विचार करता पुणे जिल्ह्यांमधील शाळांमध्ये अधिक प्रवेश झाले आहेत. ठाणे जिल्ह्यात 3 हजार 943, नाशिकमध्ये 3 हजार 503, नागपूरमध्ये 3 हजार 680 एवढे प्रवेश झाले आहेत.