खेड तालुक्यात तीन दिवस कामे ठप्प : पंचायत समिती आवारात धरणे आंदोलन
राजगुरूनगर – विविध मागण्यांसाठी खेड तालुक्यातील ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचार्यांनी सोमवार (दि. 18) पासून पुढील तीन दिवस काम बंद आंदोलन सुरू केले आहे. विविध मागण्या मान्य होण्यासाठी या सर्वांनी खेड पंचायत समितीच्या आवारात धरणे आंदोलन केले.
खेड पंचायत समितीच्या आवारात सोमवारी (दि. 18) धरणे आंदोलन केले. यावेळी ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष शंकर ढोरे, माजी अध्यक्ष राजराम रणपिसे, सचिव सुरेश घनवट, तुषार साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष निलेश पांडे, सचिवपदी देवदत्त सांडभोर, बाबाजी चव्हाण, पुनम शेवाळे, विशाखा फुलपगार, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे विजय बवले यांच्यासह खेड पंचायत समितीचे कक्ष अधिकारी रमेश ईष्टे, विस्तार अधिकारी सुभाष भोकटे,सुखदेव साळुंके, बाजार समितीचे संचालक सुधीर भोमाळे, ठेकदार संघटनेचे विवेक गायकवाड, महेश होले आणि मोठ्या संख्येने ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
या आहेत मागण्या
ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करणे, ग्रामसेवक ग्रामविकास अधिकार्यांकडील अतिरिक्त काम कमी करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीच्या अहवालातील शिफारसीची अंबलबजावणी करणे, ग्रामसेवक पदाचे सेवा प्रवेश नियमात सुधारणा करून शेक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेची पदवी करणे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 49 चे नियमात सर्व जिल्हा परिषदांच्या प्राप्त अहवालानुसार सुधारणा करणे, विस्तार अधिकारी पदाची संख्या वाढविणे. प्रशासनाच्या दिरंगाई मुळे 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्ती दिलेले मात्र नोव्हेंबर 2005 पूर्वी भर्ती प्रक्रिया चालू झालेल्या ग्रामसेवक यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करणे. कंत्राटी पद्धतीने ग्रामसेवक भरती बंद करणे.
शिक्षकांप्रमाणे ग्रामसेवकांचे प्रश्न विधान परिषदेत मांडण्यासाठी प्रतिनिधित्व मिळणे, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त संवर्ग बांधवांना वेतनवाढ मिळणेबाबतचा आदेश मान्य करावा, जिल्हा बदली ग्रामसेवक यांना 2003 च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने एक आगाऊ वेतनवाढ मंजुर करावी. विस्तार अधिकारी यांच्या वेतनातील त्रुटी दूर करुन सुधारित वेतनश्रेणीप्रमाणे सर्व विस्तार अधिकारी व आश्वाशित प्रगती योजने प्रमाणे विस्तार वेतनश्रेणीतील पात्र ग्रामसेवक संवर्ग बांधवांना वेतनश्रेणी लागु करुन वेतन निश्चिती करावी.
2006, 2007 व 2008 मध्ये आदेश प्राप्त उत्कृष्ट, अतिउत्कृष्ट काम करणार्या ग्रामसेवकांना वेतनवाढ कायम करुन वेतननिश्चिती करावी. एनपीएस/डीसीपीएस धारकांचा हिशोब करुन त्याप्रमाणेची रक्कम वर्ग करावी. जिल्हा परिषद कर्मचार्यांची न्याय मागण्यांसाठी व अडीअडचणींबाबत व त्यांच्या आस्थापना विषयक बाबींसाठी जाणीवपूर्वक लक्ष देण्यासाठी कर्मचारी पालकत्व अधिकारी सेल निर्माण करुन संघटना प्रतिनिधीत्वासह समिती गठित करावी. आदी मागण्यासाठी सरपंच ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.