– हेमंत महाजन
एकही युद्ध न हरलेला योद्धा असे वर्णन करण्यात येत असले तरीही जनरल सगतसिंग हे एक दुर्लक्षित व्यक्तिमत्त्व. 71च्या युद्धाला 52 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने घेतलेला हा थोडक्यात आढावा…
16 डिसेंबर 2023 रोजी 1971च्या युद्धाला 52 वर्षे पूर्ण झाली आहेत. याशिवाय 19 डिसेंबर 1961 च्या गोवामुक्ती संग्रामाला 62 वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन्ही युद्धामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेले सैनिकी अधिकारी होते लेफ्टनंट जनरल सगतसिंग.
लेफ्टनंट जनरल सगतसिंग, परमविशिष्ट सेवा पदक (14 जुलै 1918-26 सप्टेंबर 2001) हे भारतीय लष्कराचे थ्री-स्टार रँक जनरल होते. 1961 मध्ये गोवामुक्ती युद्ध, 1967मध्ये चीनबरोबर नाथुला येथे झालेली झडप, मिझोराममधली बंडखोरी आणि बांगलादेशमुक्ती युद्ध यात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
1961 मध्ये जनरल सगतसिंग यांना ब्रिगेडियर या हुद्द्यावर असताना 50 पॅराशूट ब्रिगेडचे कमांडर बनवण्यात आले. असे पहिल्यांदा झाले की 50 पॅराशूट ब्रिगेड नेतृत्व एका पायदळाच्या अधिकार्याला देण्यात आले होते. मात्र, पॅराट्रूपर नसल्यामुळे त्यांना पॅराट्रूपर चिन्ह लावता येत नव्हते. त्यांना हे माहिती होते की जर त्यांनी विमानातून जम्प्स करून आपले पॅरा ब्रिगेडचे प्रोबेशन (परीक्षा) पूर्ण पास केले नाही, तर त्यांना पॅराशूट ब्रिगेडच्या सैनिकांकडून सन्मान मिळणार नाही. म्हणून त्यांनी वयाच्या चाळीसाव्या वर्षी आकाशातून पॅरा जम्प्स मारून आपली पात्रता सिद्ध केली.
1962च्या गोवामुक्ती संग्राममध्ये त्यांच्या 50 पॅराशूट ब्रिगेडने वेगाने गोव्याची राजधानी पणजीकडे कूच केले आणि तिथे असलेल्या पोर्तुगीज सैनिकांना आश्चर्यचकित केले. त्यांच्या कामगिरीमुळे गोव्याची मुक्ती झाली. पोर्तुगाल सरकारने जनरल सगतसिंग यांना मारण्याकरता दहा हजार डॉलरचे इनाम त्यावेळेला जाहीर केले होते. असे इनाम लावलेले ते एकुलते एक सेनाधिकारी होते. यावरून त्यांची कामगिरी लक्षात येते.
1967 साली ते सिक्कीममध्ये नाथुला येथे भारताच्या 17 माउंटन डिव्हिजनचे नेतृत्व करत होते. त्यावेळेस चीनने भारताच्या सीमेच्या आत चोला येथे घुसखोरी केली. अतिशय आक्रमक कारवाई करून जनरल सगतसिंग यांनी चिनी सैनिकांना तेथून हुसकावून द्यायचा आदेश दिला. पुढे झालेल्या युद्धामध्ये साडेतीनशेहून जास्त चिनी सैनिक मारले गेले. भारतीय सैन्याला आपल्या सत्तर सैनिकांचे प्राण देऊन हे युद्ध जिंकता आले.
1962च्या भारत-चीन युद्धामध्ये पराभव झाल्यानंतर अशाप्रकारे चिनी सैनिकांचा आपण एका लढाईमध्ये पराभव केला आणि 1962 मध्ये मिळालेले अपयश धुऊन काढण्यात आले. त्यांनी कुठल्याही वरच्या अधिकारी तसेच भारत सरकारची परवानगी घेतलेली नव्हती. त्यांची आक्रमक कारवाई पसंत न पडल्यामुळे भारत सरकारने त्यांची तिथून बदली केली. मात्र त्यानंतर 1988 पर्यंत म्हणजे 21 वर्षे चीनने पुन्हा भारताच्या सीमेमध्ये घुसखोरी करायचे धाडस केले नव्हते.
मिझोराममधली बंडखोरी मोडली
जनरल सॅम माणेकशॉ यांना सगतसिंग यांच्या सैनिकी कौशल्याची पूर्ण जाणीव होती. म्हणून त्यांनी सगतसिंग यांना ईशान्य भारतात दहशतवादी विरोधी अभियानाकरता मिझोराममध्ये पाठवले. जिथे पुन्हा त्यांनी एक अतिशय उत्तम कारवाई केली. यावेळी मिझोराममधील बंडखोरी अतिशय हिंसक बनली होती आणि कंट्रोलच्या बाहेर जात होती. सगतसिंग यांनी अत्यंत आक्रमक कारवाई करून मिझोराममधली बंडखोरी मोडून काढली.
1971च्या युद्धासाठी डावपेच
युद्ध सुरू व्हायच्या आधी ईस्ट पाकिस्तानमध्ये चार डिव्हिजन सैन्य आणि एक लाखाहून जास्त पॅरामिलिटरी फॉर्सेस होती. तुलनेमध्ये भारतीय सैन्याच्या आठ डिव्हिजन होत्या. म्हणजे आक्रमण करणार्या भारतीय सैन्य आणि पाकिस्तानी सैन्य यांचा रेशो 2:1 असा होता. हल्ला करायचा असेल तर तिप्पट किंवा सहा पटीने सैन्याची गरज असते. हे युद्ध जिंकण्याकरता जनरल सगतसिंग यांनी नावीन्यपूर्ण डावपेच आणि युद्धाच्या पद्धती वापरल्या. केवळ संख्याबळाच्या शक्तीवरती युद्ध जिंकणे शक्य नव्हते. सर्वात जास्त यश हे पूर्व विभागात 4 कोअरच्या (जनरल सगतसिंग) 8, 57 आणि 23 माउंटन डिव्हिजन्सनी मौलवीबजार, सिल्हेट, दाउदखंडी आणि मैनामनी ही शहरे जिंकून मिळवले.
जनरल सगतसिंग यांच्या कोरने अपेक्षेपेक्षाही अधिक वेगाने पूर्व पाकिस्तानमध्ये वाटचाल केली. शत्रूचे कच्चे दुवे हेरत व मोठा प्रतिकार शक्य असलेल्या ठिकाणी वळसा घालून पुढे वाटचाल केली. जनरल सगतसिंग यांची युद्ध पद्धती अत्यंत आक्रमक होती. वेळेला महत्त्व देत त्या दृष्टीने डावपेच आखले होते. तिन्ही दिशांकडून आगेकूच करण्याचे मार्ग ताब्यात घेणे, सरहद्दीवरील पाकिस्तानी सैन्याला पीछेहाट करण्याची व ढाका येथे एकत्रित होण्याची संधी मिळू न देणे असे डावपेच वापरले गेले. टांगेलमध्ये झालेला भारतीय सैन्याचा एयर ड्रॉप, हेलिकॉप्टरच्या मदतीने नद्या पार करणे, मोठ्या शहराजवळ असलेल्या किल्ल्यांवरती हल्ला न करता त्यांच्या मागे जाऊन शत्रूचा परत जायचा रस्ता अडवणे, घोडे, बैलगाड्या अशा वाहनांचा वापर या डावपेचावेळी केला गेला.
सगळीकडून हल्ला करून पूर्वेमधील पाकिस्तानी सैन्याची कोंडी झाल्यानंतर पूर्व पाकिस्तानातील सेनापती लेफ्टनंट जनरल निआझी याने शरणागती पत्करली. 1971च्या लढाईमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतरही त्यांना प्रमोशन मिळाले नाही. बीबीसीचे पत्रकार 1971च्या लढाईमध्ये भारतीय सैन्याने बांगलादेशमध्ये अत्याचार केले, असा दुष्प्रचार करत होते. जनरल सगत यांनी बीबीसीला धडा शिकवला. बीबीसीची भारत सैन्याच्या विरुद्ध लिहिण्याची कारवाई पूर्णपणे थांबली. मात्र, सरकारला जनरल सगतसिंग यांचे वर्तन आवडले नाही आणि ते प्रमोशनपासून वंचित राहिले. जनरल सगतसिंग हे भारतीय सैन्याचे कुठलीही लढाई न हरलेले एकमेव जनरल होते; परंतु त्यांच्या लष्करी योग्यतेला पूर्ण सन्मान देण्यात आला नाही. आशा करूया की आतातरी भारत सरकार आणि भारतीय सैन्य या अत्यंत आक्रमक व्यक्तिमत्त्वाचे योगदान ओळखेल आणि त्यांना योग्य सन्मानाने पुरस्कृत करेल.