श्रीक्षेत्र भीमाशंकर यात्रा काळाबाबत शासकीय कर्मचारी द्विधामनःस्थितीत
मंचर – श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील श्रावण महिन्यातील यात्रा यशस्वी होण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना कुठलीही सुविधा पुरवण्यात आली नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजीची सूर असून, पुन्हा यात्रेसाठी ड्युटी करायची की नाही, अशा द्विधा मनःस्थित कमर्चारी आहेत.
यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांसाठी प्रशासनाने नियुक्त केलेल्या आरोग्य, पोलीस, महसूल, महावितरण कर्मचाऱ्यांना, तसेच रुग्णवाहिका चालकांना या ठिकाणी प्राथमिक सुविधा देखील मिळत नाहीत. शासनाच्या कर्मचाऱ्यांनाच निवासाची सोय नसून स्वच्छतागृहे, पिण्यास शुद्ध पाणी नसल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. या ठिकाणी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने कर्मचारी व येणाऱ्या भाविकांना निवाऱ्याची पुरेशी सोय नसल्याने सर्वांचीच गैरसोय झाली.
भीमाशंकर येथे येणारे भाविक व पर्यटकांचेसाठी भीमाशंकर मुख्य देवस्थानपासून अलीकडे चार किलोमीटर अंतरावर वाहनतळ तयार करण्यात आले आहेत. दर्शनासाठी येणारे तेथे वाहने लावून तेथून एसटी महामंडळाच्या बसने देवस्थानपर्यंत जातात. मात्र, अपुऱ्या बस असल्याने आणि भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने भाविकांना तासन् तास उभे राहावे लागते.
अनेक भाविक कंटाळून लहान मुले ज्येष्ठ नागरिकांसह चार-पाच किलोमीटर पायीच दर्शनाला जातात. यामध्ये त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनतळावर रात्री पुरेशा उजेडाची सोय नाही. पिण्यासाठी पाणी नाही स्वच्छतागृहांचा अभाव यामुळे महिलांची कुचंबणा होत आहे.
शेकडो कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास
यात्रा व्यवस्थित पार पाडण्यासाठी नियुक्त झालेल्या शेकडो कर्मचाऱ्यांना कोणत्याही सुविधा मिळाल्या नाहीत. झोपण्यासाठी व्यवस्था नसल्याने वाहनातच कसेबसे झोपावे लागत होते. स्वच्छतागृह नसल्याने उघड्यावर जावे लागत होते. पिण्यासाठी पाण्याची सोय नसल्याने विकतचे पाणी घ्यावे लागत होते. अशा विविध अडचणींचा सामना करत यात्रा काळातील ड्युटी करावी लागली.
गाडी शोधण्यासाठीही कसरत
रात्री पाऊस आणि धुके पडत असल्याने वाहन तळावर लावलेले वाहन चालकांना सापडत नाही. येथे अनेक ठिकाणी वाहनतळ केलेले असतात आणि तेथे एकाच वेळी दीड ते दोन हजार वाहने लागतात. गाडी शोधण्यासाठी भाविकांना कसरत करावी लागते. त्यातच अनेकांनी गाडी शोधून देण्यासाठी मदत करतो म्हणत गाडी शोधून देतात आणि त्यासाठी हजार, दीड हजार रुपये पैसे घेण्याचा जोरदार धंदा केला आहे, त्यामुळेही या लोकांना आवरण्यासाठीही प्रशासनावर ताण येत होता.