शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांची अपेक्षा
राजेंद्र वारघडे
पाबळ – पहिली पिके कशीबशी वाचली, दुसरी पेरता आली नाही, ज्यांनी पेरली त्यांना सोडून द्यावी लागली. शासनाचे टँकर सुरू झाले. मात्र बॅरल, दोन बॅरल पाण्याने जनाबरांचे भागत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन हजार देऊन टँकरने पाणी घ्यावे लागत असल्यानेने टँकरची संख्या वाढवण्याची गरज लालफितीत अडकू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, नागरिकाना पिण्याचे फिल्टर पाणी विकत घ्यावे लागत असले तरी उन्हाळ्याच्या झळा तीव्र झाल्याने रोजचा खर्च शंभर रुपयाच्या आसपास पोहोचला आहे. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पन्नास पैसे लिटरने पाणी मिळत असले तरी पाच रुपयाचा ठोकळा दररोज मिळवण्यासाठी दुकानदाराकडे याचना करावी लागत असल्याने भीक नको पण कुत्रा यावर अशी परिस्थिती झाली आहे. जनावराच्या चाऱ्याची बाबही गंभीर झाली असून हिरवा चारा नसल्याने दूध उत्पादन घटले आहे. छावण्या कधी सुरू होणार असा प्रश्न विचारला जात असताना प्रस्ताव मंजुरी यात उन्हाळा जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
श्रीराम जाधव या शेतकऱ्याने टँकर सुरू झाले असले तरी एकेक जनावराला चारशे लिटर पाणी लागत असून मला आतापासून टँकर विकत घ्यावा लागत आहे, अशी माहिती दिली. गावठाणात नळ योजनेद्वारे पाणी दिवसाआड दिले जात असले तरी कमी दाबाने पाणी असल्याने मोटारी लावून पाणी मिळवले जात असल्याने सोसायट्या व तीन मजली घरांना पाणी विकत घ्यावे लागत आहे, अशा परिस्थितीत कुटूंबाना दररोज दोनशे रुपये वापराचे पाण्यासाठो तर पिण्याच्या पाण्यासाठी वेगळे पैसे खर्च करावे लागत आहे.
लालफितीचा अनुभव
दरवर्षीचा अनुभव पाहून महिन्यापूर्वीच प्रस्ताव देऊनही पुन्हा प्रस्ताव दिला असून तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्वरित निर्णय होणे गरजेचे आहे, चारा छावणी, त्यासाठी पाच टँकर व गावठाण वाडीवस्त्यासाठी नऊ टँकर गरजेचे आहेत असे परिस्थितीत सहा टँकर मिळून अडचणी वाढत आहे. यासाठी चौदा टँकर व प्रत्येकी तीन फेऱ्या केल्या तरच नियोजन होणार आहे, यात लालफितीचा अनुभव आत्ताच येत असल्याने त्वरित निर्णय व्हावे, अशी मागणी पाबळ चे विद्यमान सरपंच सतीश वाबळे यांनी केली आहे.
निवडणुकीमुळे टँकर मिळेना
निवडणुकांमुळे कारखाना, पतसंस्था यांच्या मार्फत मिळणारे टँकर लालफितीत अडकले गेले असून स्थानिक ग्रामपंचायतींना टँकर मिळवता येत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे, अशा परिस्थितीत पाणी समस्यांवर जलद मार्ग निघाला नाही तर मतदानावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.