बेट भागात नुकसानग्रस्तांची पाहणी
सविंदणे/टाकळी हाजी – महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात रविवारी (दि. 26) वादळी पाऊस व गारपीट झाली. यामध्ये शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये पंचनामे करण्याचे आदेश दिले असून पंचनामे झाल्यानंतर किती नुकसान झाले याचा अंदाज घेऊन याबाबत शेतकर्यांना जास्तीत जास्त सामुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडू, असे राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
शिरूर-आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शिरूर तालुक्यात रविवारी (दि. 26) सायंकाळी वडनेर, सविंदणे, कवठे येमाई, मलठण, माळवाडी, म्हसे, निमगाव दुडे व टाकळी हाजी परिसरातील होणेवाडी, साबळेवाडी, शिनगरवाडी, उचाळेवस्ती, डोंगरगण, तामखरवाडी या भागात मोठ्या प्रमाणात गारपिट होऊन शेती पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकर्यांच्या शेतातील डाळिंब, कांदा, गहू, ज्वारी, ऊस इतर रब्बी हंगामातील पिके पूर्णपणे भुईसपाट झाली आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केली. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, व्हाइस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, घोडगंगाचे संचालक सोपान भाकरे, सविंदणेच्या सरपंच शुभांगी पडवळ, उपसरपंच नंदा पुंडे, माजी सरपंच वसंत पडवळ,
बाळासाहेब भोर, आदी शेतकर्यांसह शासनाच्या वतीने जिल्हा कृषी अधिकारी संजय काचोळे, शिरूरचे प्रांत अधिकारी हरेश सुळ, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, गट विस्तार अधिकारी बाळासाहेब गावडे, मंडल अधिकारी माधुरी बागले, तलाठी आबासाहेब मोरे, शांताराम सातपुते, कृषी सहाय्यक नंदू जाधव, संतोष बेंद्रे आदी अधिकारी उपस्थित होते. व शेतकरी उपस्थित होते. यावेळी वळसे पाटील यांनी प्रशासनास तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून शेतकर्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.