मंचर – नागापूर (ता. आंबेगाव) गाव परिसरात आपण अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. थापलिंग गडावर देखील दूरदृष्टी ठेवून अनेक कामे आपण केली. अर्धवट राहिलेली कामे आता आपण हाती घेणार आहोत. यासाठी बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना पुन्हा गड पाहणीसाठी पाठवून ती कामे नव्याने सुरू करणार आहे. यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
नागापूर (ता. आंबेगाव) येथील श्रीक्षेत्र थापलिंग गडावरील खंडोबा देवाच्या दर्शन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी (दि. 28) घेऊन तळी भंडार केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने मंत्री वळसे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी सरपंच वैशाली पोहकर, शिवशंकर पोहकर, श्रीहरी पवार, केरभाऊ चासकर, मनेश रिठे, उल्हास पवार, विजय चासकर, नंदू पोहकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
मंत्री वळसे पाटील म्हणाले की, थापलिंग गडावर वर्षातून केवळ एक-दोन दिवसच मोठ्या प्रमाणावर भाविक येतात; परंतु आपण गडावर काही बदल, सुधारणा केल्यास बाराही महिने लोक आले पाहिजेत. हे डोळ्यासमोर ठेवून आपण याठिकाणी मंगल कार्यालय काढण्याचे ठरवले आहे, असे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी निरगुडेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रमुख प्रताप वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे संचालक दादाभाऊ पोखरकर, बाबासाहेब खालकर, शरद बँकेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लोंढे, रमेश खिलारी, आनंद शिंदे, निलेश थोरात, उद्योजक मनोहर शेळके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पारगावचा पूल पूर्ण झाल्यानंतर
नागापूर गावाला देखील आपण विविध विकासकामांसाठी भरपूर निधी मिळवून दिला आहे. आता नागापूर गाव हे अष्टविनायक महामार्गावर आले आहे. पारगावचा पूल पूर्ण झाल्यानंतर या महामार्गावरून वाहनांची वर्दळ वाढून दळणवळण वाढणार आहे. याचा फायदा देखील नागापूर गाव व परिसराला होणार आहे.