नीरा : पुरंदर आणि बारामती तालुक्यातील गुळुंचे आणि चौधरवाडी गावालगत वनविभागाच्या हद्दीमध्ये कुत्र्यांच्या तावडीतून हरणाची सुटका करून वनविभागाच्या ताब्यात हरणाला देण्यात आले. गुळुंचे गावाचे पोलीस पाटील दीपक जाधव यांनी याबाबत वनविभागाला माहिती देऊन ते हरिण वनविभागाच्या ताब्यात दिले आहे.
सद्य:स्थितीतील तीव्र दुष्काळांमुळे ग्रामीण भागातील वन्यप्राण्यांची जिवाची काहिली होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी भटकंती करूनही पुरेसा चारा व पाणी मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाल्याने पाण्यावाचून वन्यप्राण्यांची घालमेल होत आहे.
मंगळवारी (दि. 30) सायंकाळी सहा वाजता चौधरवाडी परिसरात पाणी चार्यासाठी भटकंती करताना एक हरिण भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडले होते;
परंतु गुळूंचे गावातील पोलीस पाटील दीपक जाधव, निखील खोमणे या तरुणांना हा प्रकार दिसताच त्यांनी कुत्र्यांच्या तावडीतून त्या हरणाची सुटका केली. याबाबत वनविभाग अधिकारी नवनाथ रासकर आणि रेस्क्यू टीम यांना बोलावून त्यांच्या ताब्यात देण्यात आले.