मंचर – संगमनेर (अहमनदगर) येथून आळंदी येथे पायी निघालेल्या दिंडीमधील ज्येष्ठ वारकऱ्याचा पेठ (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीतील घाटात भजन म्हणत पायी जात असताना दम लागून हृदयविकाराचा झटका आल्याने सोमवारी (दि. ४) सायंकाळी मृत्यू झाला आहे. अशोक रंगनाथ बडे (वय ६०, रा. मनोली, ता. संगमनेर, अहमनगर) असे या वारकऱ्याचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे वारकऱ्यांवर शोककळा पसरली आहे.
आळंदी येथील कार्तिकी एकादशीनिमित्त मनोली (ता. संगमनेर) येथून आळंदीला निघालेली सद्गुरू दयाळूबाबा या पायी दिंडीने २९ नोव्हेंबरला मनोली येथून प्रस्थान केले होते. सोमवारी दुपारी कळंब (ता. आंबेगाव) येथे जेवण कररून दिंडी मार्गस्थ झाली असता, पेठ गावच्या हद्दीत हॉटेल रानवाराजवळ आली असता अशोक बडे हे भजन कीर्तन म्हणत असताना अचानक चक्कर येऊन ते रस्त्यावर कोसळले.
वारीतील सहकारी वारकऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना तात्काळ रुग्णाहिकेतून मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणले असता रुग्णालयातील डॉ.संजय दुधवडे यांनी त्यांना तपासून ते मयत झाले असल्याचे सांगितले.
हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. अशोक बडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, सून, नातू असा परिवार असून, त्यांचा मुलगा सैन्य दलात काश्मीर येथे ड्युटीवर आहे.