भात रोपे करपली : कृत्रिम पद्धतीने पाणी देण्याची धडपड
राजगुरुनगर – तांदळाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भातलावणी करण्यासाठी भात रोपांची पेरणी होऊन त्याची उगवण झाली आहे. मात्र पाऊस पडत नसल्याने भात रोपांची वाढ मंदावली आहे. काही ठिकाणी रोपे करपू लागली आहेत त्यावर उपाय म्हणून कृत्रीम पद्धतीने पाणी देवून शेतकरी रोपे जगविण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.
खेड तालुक्यात खरीप हंगामात सर्वाधिक 7 हजार 750 हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लावणी होते. जूनच्या सुरुवातीपासून ते जून महिन्याच्या शेवट पर्यंत तालुक्यात भात रोपांसाठी पेरणी होते. जून जुलै महिन्यात भात रोपे उपटून त्याची लावणी केली जाते आणि साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भात पिकांची काढणी आणि झोडपणी केली जाते. दरवर्षी प्रमाणे खेडच्या पश्चिम भागात भात रोपांची धूळवाफेवर पेरणी केली आहे; मात्र सुरुवातील थोडाफार वळवाचा पाऊस झाला धूळवाफेवर भात रोपे उगवली मात्र आता पावसाने उघडीप दिल्याने भात रोपे करपू लागली आहेत तर काही ठिकाणी ही रोपे कमी पावसामुळे उगवली नाहीत.
दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाने उघडीप दिली आहे. धुळे वाफेवर पेरणी झालेली भात रोपे काही गावांमध्ये उगवून आली आहेत त्यांना जागविण्याचे शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान तयार झाले आहे. उगवलेली रोपे जो पर्यंत मान्सून पाऊस पडत नाही तो पर्यंत त्यांना डोक्यावर हंड्याने, डिझेल इंजिन किंवा विजेच्या मोटारीद्वारे जवळच्या विहिरीतून नदीतून किंवा शेततळ्यातून पाणी द्यावे लागत आहे यासाठी शेतकऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या सोयी नुसार भात रोपे जागवण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र अनेक शेतकऱ्यांकडे अशी सोयच नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे.
…रोपांची वाढ चांगली होत नाही
भोरगिरी, भिवेगाव, मोरोशी, नायफड, आव्हाट, आदी गावांच्या परिसरात भात रोपे उन्हापासून वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. कृत्रिम पाणी घालून जागविलेली रोपांची वाढ चांगली होत नाही त्या रोपांची वाढ मंदावली आहे. गावांमध्ये भातरोपे करपू लागली आहेत. यावेळीही शेतकऱ्यांना भातारोपांच्या वाढीसाठी कृत्रीमपद्धतीने पाणी देण्याची वेळ आली आहे.
दरवर्षी जून च्या सुरुवातील पाऊस पडतो भात रोपांची वाढ होते; मात्र काही वर्षांपासून पावसाच्या ऋतू चक्रात बदल जाणवत आहे. मृग नक्षत्रात पाऊस पडत नाहीत भात रोपांची आम्ही दरवर्षीच्या अंदाजावर पेरणी करतो. पावसाने उघडीप दिली की उगवलेल्या रोपांना कृत्रिम पद्धतीने पाणी देत जगवतो पुढेही पाऊस झाला नाही तर कृत्रिम पद्धतीने भात खाचरात विहिरीचे ओढ्याचे किंवा नदीचे पाण्याने भात खाचरे भरून त्याची लावणी करतो.
– अंबर वाळुंज, प्रगगशील शेतकरी, आव्हाट