42 योद्धांचे स्मृतिस्थळ उभारण्याची होती संकल्पना : जिल्हा परिषदेकडे हस्तांतर
पुणे – करोना प्रादुर्भावच्या काळात कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेत स्मृतिस्थळ उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. स्मृतिस्थळाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटने हे स्मृतिस्थळ जिल्हा परिषदेकडे आज हस्तांतर केले आहे.
करोना कालावधीमध्ये काम करणाऱ्या 42 योद्धांचे स्मृतिस्थळ उभारण्याची संकल्पना तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी मांडली होती. हे स्मृतिस्थळ कोठे करायचे, असा प्रश्न होता; पण खर्चाचाही विषय तितकाच महत्त्वाचा होता. आयुष प्रसाद यांनी यासंदर्भात सिरम इन्स्टिट्यूटशी संपर्क साधला. त्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये जिल्हा परिषद इमारतीच्या मध्यभागी मोकळ्या असलेल्या जागेमध्ये हे स्मृतिस्थळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
सीरम इन्स्टिट्यूटने हे स्मृतिस्थळ जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत केले आहे. याबाबतची कार्यवाही मंगळवारी पूर्ण करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, पुनावाला फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जसविंदर नारंग, फाउंडेशनचे मुख्य लेखाधिकारी सतीश देशपांडे, वास्तुविशारद अभिजित पवार आदी उपस्थित होते.
करोना महामारीने संपूर्ण देशात हाहाकार उडाला होता. अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता सेवा दिली. रुग्णालय, घरोघरी जाऊन माहिती गोळा करणे, औषध फवारणे, गावांच्या वेशीवर चेक नाक्यावर तपासणी करणे आदी कामे केली.
कार्य आठवणीत
कर्तव्य बजावताना जिल्हा परिषद अंतर्गत काम करणारे 24 तसेच गावपातळीवर ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असणारे 18 असे एकूण 42 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांचे काम नेहमी आठवणीत राहावे म्हणून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांचे स्मृतिस्थळ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.