भाटघर -सद्यःस्थितीला विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे; परंतु भाटघर धरणाच्या पश्चिमेकडील सोळा गावात नेटवर्कला रेंज नसल्याने ऑनलाइन शिक्षणाला पूर्णविराम मिळाला आहे. यामुळे भविष्यात इतर भागातील विद्यार्थ्यांपेक्षा या भागातील विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या पिछाडीवर राहणार आहेत.
करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यामुळे सद्यःस्थितीला शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिकदृष्ट्या नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देणे सुरू आहे; परंतु भाटघर परिसरातील सोळा गावांमध्ये नेटवर्कला रेंज नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण देणे अशक्य झाले आहे. आजकाल प्रत्येक क्षेत्रात चढाओढ निर्माण झाली आहे.
या स्पर्धेच्या युगात शिक्षणाला फार महत्त्व आहे. चांगली नोकरी मिळवायची असल्यास उत्तम मार्क मिळवून पास होणे गरजेचे आहे; परंतु सद्यःस्थितीत या परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणालाच पूर्णविराम मिळाला असल्याने येथील विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता कमी होणार आहे.
यामुळे भविष्यात येथील विद्यार्थ्यांची प्रगती होणार नाही. भाटघर परिसर पूर्वीपासूनच आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. येथील नागरिकांच्या जमिनी धरणांमध्ये संपादित झाल्या आहेत. एका बाजूला धरण तर दुसऱ्या बाजूला डोंगर अशी येथील भौगोलिक स्थिती असल्यामुळे जमीन कसण्यासही कमी आहे. या भागात एकही कंपनी नाही. यामुळे येथे रोजगाराचा गंभीर प्रश्न आहे.
परिणामी येथील नागरिक आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. गरीब परिस्थितीत का होईना आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिल्याने परिस्थिती भविष्यात बदलेल अशी आशा पालकवर्ग बाळगून आहेत; परंतु यावर्षी आपला पाल्य शिक्षणापासून वंचित राहिल्याने पालकांच्या पदरी निराशा आली आहे.