केंद्राचा नवीन कृषी कायदा : मावळ भाजपचे निषेध आंदोलन
वडगाव मावळ – कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी, दलाल, मापाडी यांच्या पिळवणुकीतून शेतकऱ्यांची सुटका करणारा व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालविषयी स्वांतत्र्य देणारा नवीन कृषी कायदा केंद्र सरकारने मंजूर केला. त्यानंतर महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारने तो कायदा राज्यात लागू न करता त्यास स्थगिती आदेश दिला. त्याच्या निषेधार्थ भाजपचे तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्या नेतृत्वाखाली मावळ तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्य सरकारने दिलेला स्थगिती आदेश तत्काळ मागे घ्यावा, अशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांना देऊन राज्य सरकारच्या स्थगिती आदेशाची होळी करण्यात आली.
यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यातील शेतकऱ्यांच्या फायद्याच्या तरतुदी स्पष्ट केल्या. तसेच राज्यातील सत्ताधारी पक्ष नवीन कृषी कायद्याबद्दल शेतकरी व समाजात खोटा प्रचार करून भ्रम निर्माण करत असल्याचा आरोप तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी केला.
यावेळी माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, संघटनमंत्री किरण राक्षे, सरचिटणीस सुनील चव्हाण, मच्छिंद्र केदारी, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव राक्षे, किसान मोर्चा अध्यक्ष सुभाषराव धामणकर, कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे, दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे, ओबीसी आघाडी अध्यक्ष रवी विधाटे, कुसगाव गण अध्यक्ष शेखर दळवी, तालुका चिटणीस अमोल धिडे, सदाशिव देशमुख, विठ्ठल तुर्डे, प्रदीप मोढवे, विकी म्हाळस्कर, गणेश साबळे, राहुल गोळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.