पुणे – शेतकऱ्यांना शेती निगडीत इतर कारणांसाठी कर्जपुरवठा व्हावा, यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून बळीराजा मुदत कर्ज आणण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना दीड लाख ते सात लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा बॅकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी दिली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आकस्मिक गरजांसाठी सहज आणि तत्पर कर्ज मिळणे शक्य होणार आहे.
बॅंकेच्यावतीने नोव्हेबर २०२३ अखेरची आर्थिक स्थितीची माहितीसाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बॅकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, उपसरव्यवस्थापक संजय शितोळे, सहायक सरव्यवस्थापक समीर राजपूत, उपसरव्यवस्थापक संजय वाबळे, सुधीर पाटोळे आदि उपस्थित होते.
डॉ. दुर्गाडे म्हणाले, यंदा ही योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. त्यासाठी साडेदहा टक्के व्याजदर आकारण्यात येत आहे. परतफेड सात वर्षे आहे. या सर्व प्रकारांत संबधित गरजू शेतकरी सभासद जादा व्याजदरामुळे आर्थिक अडचणीत जात आहे. यासाठी शेतीकर्ज पुरवठ्याअंतर्गत शेतकऱ्यांची मागणी व परतफेड क्षमता याचा विचार करून धोरण निश्चित केले आहे.
चालू वर्षी बॅकेने व्याजदरात घट केली आहे. त्यामुळे बॅकेच्या वैयक्तिक कर्जे विभागाअंतर्गत गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, सोनेतारण कर्ज, पगारदार कॅश क्रेडीट कर्ज, चार चाकी वाहन कर्ज, व्यापारी नजरगहाण कर्ज, दुचाकीसाठी कर्ज पुरवठ्यात वाढ करण्यात आली होती. याशिवाय महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनाही कर्ज पुरवठा करण्यात येत आहे,अशी माहिती डॉ. दुर्गाडे यांनी दिली.
नोटबंदीच्या काळातील राज्यातील सात जिल्हा बॅकेचे सुमारे 100 ते 125 कोटी रूपये बदलून मिळण्याचे बाकी आहे. यामध्ये पुणे जिल्हा बॅंकेचे सुमारे 22 कोटी रुपये अडकून पडले आहेत. याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. तसेच सहकार विभाग सुध्दा याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार आहे,अशी माहिती डॉ. दुर्गाडे यांनी दिली.