चारचाकीला ६०० रुपये आकारणी : वनविभागाचा उपराटा कारभार
खडकवासला – पुण्याचा ऐतिहासिक मानबिंदू असणारा “किल्ले सिंहगड”वर गाडी घेऊन सिंहगडावर जाता येणार नाही. आत्ता एका चार चाकीतून ५ जण १०० रूपयांत गडावर जात आहेत. त्यांना यापुढे किमान ६०० रूपये तर दुचाकीला ५० रुपयेच्या बदल्यात किमान २५० रुपये भरावे लागणार आहेत.
वनविभागाने टोलच्या रुपाने आजपर्यंत करोडो रूपये जमा केले. पण नक्की कुठे घालवले, हे माहित नाही. गडावर वनविभागाच्या वतीने साधे शौचालय पण नाही. जे शौचालय आहे. तिथे पैसे आकारले जातात. वास्तविक चार चाकीला १०० व दुचाकीला ५० रुपये टोल आकारला जातो.
यातून लाखो रूपये महिन्याला टोल जमा होत आहे. पण वनविभागाचे अधिकारी नक्की काय करतात, याचा थांगपत्ता लागला आहे. यापूर्वी E-Bus वरून पर्यटकांची होणारी वाहतूक राजे शिवराय प्रतिष्ठानच्या आंदोलनानंतर बंद करण्यात आली होती. आता परत एकदा स्थानिक जीप गाडी मालकांना रोजगार म्हणून पर्यटकांची पिळवणूक सुरू करणार आहेत.
पर्यटकांनी खाली डोणजे गावात गाडी लावायची. तिथे पार्किंगला ५० ते १०० रुपये भरायचे. त्यानंतर प्रत्येकी १०० रुपयांप्रमाणे त्यांच्या खासगी जीपमधूनच गडावर जायचे, असा तुघलकी निर्णय वन विभागाने घेतला आहे.
शिवप्रेमींची होणारी पिळवणूक राजे शिवराय प्रतिष्ठान कदापि मान्य करणार नाही/ यासाठी मोठे जनआंदोलन उभारुन वनविभागाला हा निर्णय मागे घ्यायला भाग पाडू, असा इशारा महेश पवळे यांनी दिला आहे.